


पंचनामे करण्यासाठी गेलेल्या तलाठ्यास सर्पदंश, प्रा. राम शिंदे यांनी रुग्णालयास भेट देत केली विचारपूस
जामखेड प्रतिनिधी
जामखेड तालुक्यातील धनेगाव परीसरात अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या शेतीचे पंचनामे करण्यासाठी गेलेल्या तलाठ्यास सर्पदंश झाल्याने त्यास धनेगाव येथील ग्रामस्थांच्या मदतीने तातडीने जामखेड येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनेची माहिती समजताच सभापती प्रा.राम शिंदे यांनी देखील हॉस्पिटल मध्ये जाऊन विचारपूस केली.

मागिल पंधरा दिवसांन पासून जामखेड तालुक्यात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झालेली आहे. अनेक शेतकर्यांच्या शेतीचे नुकसान झाले असून शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. याबाबत प्रशासनाने अतिवृष्टीमुळे झालेल्या शेती पिकांचे पंचनामे तातडीने करण्याच्या सूचना महसुल विभागाने दिल्या आहेत. त्यामुळे शेतकर्यांच्या बांधावर जाऊन प्रत्यक्ष पहाणी करुन महसुल विभागाचे ग्रामसेवक व तलाठी हे पंचनामे करण्याचे काम करीत आहेत.

याच अनुषंगाने आज गुरवार दि २ ऑक्टोबर रोजी दसऱ्याचा सण आसुनही धनेगाव परीसरात तलाठी आकाश काशिकेदार हे नुकसान झालेल्या शेताचे सकाळी आठ वाजल्यापासून पंचनामे करीत होते. यावेळी सकाळी अकरा वाजताच्या सुमारास तलाठी केदार हे नदिच्या कडेने शेतकरी सुहास काळे, संदिप काळे व प्रमोद काळे यांच्या शेताकडे चालले होते. याच दरम्यान गवतात आसलेल्या सापावर तलाठी यांचा पाय पडल्याने त्यांना सापाने दंश केला व त्यांना लगेचच चक्कर येण्यास सुरवात झाली. ही घटना त्यांच्या सोबत असलेल्या शेतकर्यांच्या लक्षात आली त्यांना तातडीने शेतातुन शेतकऱ्यांनी उचलुन आणत धीर देत जवळील वस्तीवर आणण्यात आले व तातडीने चारचाकी वाहनाने जामखेड येथील खाजगी शिलादीप हॉस्पिटलला उपचारासाठी दाखल करण्यात आले. यावेळी त्यांना हॉस्पिटलला घेऊन जाण्यात शेतकरी सुहास काळे, संदिप काळे, वैभव काळे, अनिल काळे, पवन काळे व मनोज काळे यांनी मदत केली.

घटनेची माहिती मिळताच खाजगी हॉस्पिटलला सभापती प्रा. राम शिंदे यांनी भेट देऊन तलाठी आकाश काशिकेदार यांच्या तब्यतेची विचारपूस केली. सध्या तलाठी केदार यांची प्रकृती स्थिर आहे. तसेच तहसीलदार मच्छिंद्र पाडळे यांनी देखील हॉस्पिटल मध्ये जाऊन तलाठी यांच्या प्रकृतीची विचारपूस केली.








