जामखेड प्रतिनिधी
श्रीगोंदा सत्र न्यायालयाचे सत्र न्यायाधीश एम. एस. शेख यांनी डॉ. भास्कर मोरेचा जामीन फेटाळला आहे. यापूर्वी देखील जामखेड न्यायालयाने त्याचा जामिन अर्ज फेटाळला होता. त्यामुळे मोरेचा कोठडीतील मुक्काम वाढला आहे.
रत्नदीप मेडिकल फाउंडेशनचा अध्यक्ष डॉ. भास्कर मोरे हा स्रीलंपट प्रवृत्तीचा व समाजविघातक कृती करणारा व्यक्ती असून त्याने केलेला विनयभंगाचा गुन्हा हा स्त्रियासंबंधी व गंभीर स्वरुपाचा आहे. यासंदर्भात आणखीही १० मुलींनी मोरे विरूद्ध
तक्रार अर्ज दिलेले आहेत. त्यातील एका विद्यार्थिनीच्या जबाबावरुन कलम ५०९, ५०० नुसार गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे.
यापूर्वीच्या अशाच प्रकारे नोंद झालेल्या कलम ३५४, ३५४ अ, ५०९ या गुन्हामध्ये सदर आरोपीविरुध्द एकूण २३ मुलींनी तक्रारी अर्ज केले होते. परंतु अर्जदारास न्यायालयातून अटकपूर्व जामीन मंजूर झाल्यामुळे त्या मुली तक्रार करण्यास पुढे आल्या नाहीत. मोरे विरुद्ध आतापर्यंत सहा वेगवेगळया दखलपात्र गुन्हयांची नोंद झालेली आहे. तसेच एकूण ४ अदखलपात्र गुन्हयांची नोंद झालेली आहे. तेव्हा आरोपीस जामीन मंजूर झाल्यास तो अशाच प्रकारचा गुन्हा करण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच न्यायालयाने आरोपीस या पुर्वीच्या गुन्ह्यात दिलेल्या जामीनाचे अटी व शर्तीचे वारंवार उल्लघंन करीत आहे. आरोपीला कायदयाचा धाक असल्याचे दिसून येत नाही. त्यामुळे आरोपी डॉ. भास्कर मोरेचा जामीन अर्ज श्रीगोंदा सत्र न्यायालयाचे न्यायाधीश एम. एस. शेख यांनी फेटाळला. त्यामुळे मोरेचा कोठडीतील मुक्काम वाढला आहे. सदर प्रकरणी डाॅ. भास्कर मोरेचा जामीन अर्ज फेटाळण्यात यावा यासाठी फिर्यादीच्या वतीने ॲड. कापसे मॅडम, ॲड. अनिकेत भोसले, ॲड. अमोल जगताप, ॲड. सुमित बोरा ॲड. अभिषेक तोरडमल यांनी काम पाहिले.
या संदर्भात दिलेल्या आदेशानुसार आरोपी डॉ. भास्कर मोरे याने त्याचे शिक्षण संस्थेत शिकणाऱ्या विदयार्थी विदयार्थिनींचा मानसिक, आर्थिक, लैंगिक छळ केला असल्यामुळे सर्व विद्यार्थ्यांनी जामखेड येथे ठिय्या आंदोलन सुरु केले होते, त्यामुळे जामखेड शहरात तणावाचे वातावरण निर्माण होवून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता. आरोपीच्या विरुध्द ५ मार्च ते १५ मार्च २०२४ पर्यंत आरोपीच्या संस्थेमधील निरनिराळ्या विदया शाखेतील ज्यामध्ये डी. फार्मसी, बी. फार्मसी, बी.एच.एम.एस., बी.ए.एम.एस, नर्सिंग व इतर विदयार्थ्यांनी उपोषण व सत्याग्रह केलेला होता. त्यामध्ये सर्वच म्हणजे जवळपास १२०० मुल-मुली यांनी सहभाग घेतला होता. त्यांच्या सत्याग्रहाची किंवा उपोषणाची दखल महाराष्ट्र शासनाने तसेच सर्वच राजकीय पक्षांनी सामाजिक संस्थांनी घेतलेली होती. या आंदोलनामध्ये विदयार्थ्यांना सत्ताधारी पक्ष व विरोधी पक्ष यांनी पुर्णपणे पाठिंबा दिला होता. एवढेच नाही तर महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यांनी स्वतः उपोषणकर्त्या विदयार्थ्यांशी सवांद साधून संस्थेविरुध्द व आरोपीविरुध्द कडक कारवाई करण्याचे आदेश दिलेले होते.
तसेच एकूण तीन विदयापीठाचे प्रतिनिधींनी संस्थेला भेट देवून संस्थेच्या विरुध्द कारवाई करण्यासाठी विदयापीठाकडे तपासणी अंती अहवाल पाठविलेला आहे. आणि या प्रत्येक घटनांची नोंद ही उपोषण काळामध्ये विविध वृतपत्रांद्वारे सामान्य लोकांपर्यंत पोहोचली आहे. तसेच या संस्थेच्या चुकीच्या कारभाराच्या संदर्भात तसेच विद्यापीठाच्या प्रतिनिधींना तपासणी करतेवेळी संस्थेतर्फे करण्यात आलेल्या अडचणीसंदर्भात तसेच संस्थेच्या अनेक गैरकृत्याविषयी प्रसारमाध्यमांद्वारे छोट्या छोट्या रिल्स तयार करून प्रसिध्द करण्यात आलेल्या आहेत. त्या सर्वांना पाहण्यासाठी प्रसारमाध्यमामध्ये उपलब्ध आहेत तसेच जामखेड या शहरामधील सर्व सामान्य लोकांनी व व्यापाऱ्यांनी जामखेड शहर एक दिवस कडकडीत बंद ठेवून या आरोपीच्या कृत्याचा निषेध केला आहे. त्यामुळे एकंदरित सर्व बाबींचा विचार केला असता, आरोपीच्या विरुध्द कोणत्याही प्रकारचे राजकीय षडयंत्र असल्याचे दिसून येत नाही तर विद्यार्थ्यांनी व समाजाने उस्फुर्तपणे आरोपीच्या कुकृत्याविरुध्द केलेला उठाव / कांती असल्याचे स्पष्ट होते.
तसेच आरोपीची विदयार्थ्यांमध्ये असलेली दहशत व शैक्षणिक वर्ष बरबाद होण्याच्या भितीमुळे तत्काळ पिडितीने तक्रार दिली नाही. जेव्हा आरोपीविरुध्द सर्वच विद्यार्थ्यांनी सामुहिक उठाव केल्यानंतर पिडितेला आधार मिळाल्याने व तिची भिती नष्ट झाल्यामुळे तिने पुढे येवून तक्रार उशीरा दाखल केल्याचे कारण संयुक्तिक व विश्वसनीय वाटते. या मुळे भास्कर मोरेने केलेले एकुणच कृत्य हे कायद्याच्या विरूद्ध व रत्नदीप मेडिकल कॉलेजमध्ये शिक्षण घेणाऱ्या मुलांचे शिक्षण भवितव्य धोक्यात टाकणारे असल्याने जामीन दिल्यास तो फिर्यादी व इतर साक्षीदार यांना धमकाविण्याची शक्यता नाकारता येत नाही. आरोपीला जामीन झाल्यास आदोंलन करणारे विद्यार्थी पुन्हा हिसंक होवून आंदोलन करण्याची शक्यता नाकारता येत नाही. गुन्हयातील आरोपी हे संस्थाचालक या नात्याने पालक असून देखील अनेक मुलींचा विनयभंग / लैंगिक छळ केल्याचे स्पष्ट दिसून येत आहे व अशा गुन्हयाचा सखोल तपास करणे आवश्यक आहे. सदर गुन्हयाबाबत प्रसिध्दी माध्यमांमध्ये अनेक बातम्या आलेल्या आहेत. आरोपी हा संस्थापक अध्यक्ष असल्याने तो प्रॅक्टीकल विषयात नापास करतील या भितीने मुली तक्रार करण्यास समोर येत नाही, त्यामुळे आरोपी इसम हा तपास पूर्ण होईपर्यंत जास्तीत जास्त दिवस न्यायालयीन कोठडीत राहणे आवश्यक आहे. सदर गुन्हयातील आरोपींनी अनेक विदयार्थिनी मुलींचा लैंगिक छळ केल्याचे प्रथमदर्शनी स्पष्ट दिसून येत आहे. असे अनेक मुद्दे न्यायालयाच्या निदर्शनास आल्याने श्रीगोंदा सत्र न्यायालयाचे सत्र न्यायाधीश एम. एस. शेख यांनी डॉ. भास्कर मोरेचा जामीन फेटाळला आहे. त्यामुळे मोरेचा कोठडीतील मुक्काम वाढला आहे.
चौकट
रत्नदीप कॉलेजच्या विद्यार्थीनी व विद्यार्थ्यांच्या होत असलेल्या लैंगिक, आर्थिक व शैक्षणिक पिळवणूकी विरूद्ध विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला सपोर्ट करण्यासाठी जामखेड येथील शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे पांडूराजे भोसले, संभाजी ब्रिगेडचे प्रदेश उपाध्यक्ष आण्णासाहेब सावंत, मनसेचे तालुका अध्यक्ष प्रदिप टापरे, सामाजिक कार्यकर्ते केदार रसाळ, रमेश आजबे, आरपीआयचे सुनिल साळवे यांचेसह मुख्यमंत्री, सत्ताधारी व विरोधी पक्षाचे लोकप्रतीधी, जिल्हा पोलीस अधीक्षक, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, संबंधित विद्यापीठं, पत्रकार, ग्रामस्थ, शहरातील व्यापारी यांनी विविध पध्दतीने केलेली अंदोलने व पाठपुरावा या मुळे आरोपी मोरेला अटक व त्यावर होत असलेली कारवाई याबाबत न्यायालयाने कौतुक केले आहे तर जामखेड पोलीसांकडून भास्कर मोरेचे पुर्वीचे प्रकरण व याप्रकरणात होत असलेल्या संशयास्पद कामगिरी बद्दल श्रीगोंदा न्यायालयाने जामखेड पोलीसांवर ताशेरे ओढले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here