रोखठोक जामखेड…
अहमदनगर जिल्ह्यात कोरोना रूग्ण संख्या झपाट्याने वाढत असल्याने जिल्ह्यातील सर्व आठवडे बाजार बंद करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले यांनी दिले आहेत. याच अनुषंगाने जामखेड चा उद्या शनिवार दि २७ रोजी भरणारा अठवडी बाजार देखील बंद ठेवण्यात येणार आसल्याची माहिती तहसीलदार विशाल नाईकवाडे व मुख्याधिकारी मिनीनाथ दंडवते यांनी दिली.
अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक सुरूच असुन दिवसेंदिवस रुग्ण संख्या वाढत चालली आहे. याच अनुषंगाने गर्दी टाळण्यासाठी व कोरोनाला अटकाव करण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ राजेन्द्र भोसले यांनी नुकतेच अहमदनगर जिल्ह्यातील अठवडी बाजार बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. या मध्ये २९ मार्च २०२१ ते १५ एप्रिल २०२१ पर्यंत जिल्ह्यातील आठवडे बाजार बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ.भोसले यांनी दिले आहेत. तसेच साखरपुडा, लग्न आणि धार्मिक कार्यक्रमांनाही संबंधित अधिकाऱ्यांची पूर्व परवानगी आवश्यक असणार आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून जामखेड तालुक्यातील देखील कोरोना रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार उद्या शनिवार दि २७ रोजी भरणार अठवडी बाजार बंद ठेवण्याचा निर्णय जामखेड च्या प्रशासनाने घेतला आहे. तसेच त्या पुढील आठवडेबाजार देखील दिनांक १५ एप्रिल पर्यंत बंद राहणार आहेत अशी माहिती तहसीलदार विशाल नाईकवाडे व मुख्याधिकारी मिनीनाथ दंडवते यांनी दिली आहे.






