जामखेड प्रतिनिधी
आ. रोहीत पवार यांनी विकास कामांचा धडाका सुरू केला आहे त्यांच्या पाठीशी जनतेने खंबीरपणे रहावे. मी स्वतः नितीन गडकरी यांच्या चांगल्या कामाचे कैतुक करतो. तसे आ. रोहित पवार यांच्या कामाचे देखील कैतुक करायला शिका. उगाच उंटावरून शेळ्या हाकुन जमत नाही. जनतेने आपल्याला का नाकारले याचे आत्मपरीक्षण करा असा टोला अजित पवार यांनी माजी मंत्री प्रा राम शिंदे यांचे नाव न घेता त्यांना लावला.
कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांच्या मतदारसंघातील विविध विकासकामांचा शुभारंभ आज जामखेड आणि कर्जत इथे संपन्न झाला. यावेळी जामखेड तालुक्यातील २२८ कोटींच्या मंजूर झालेल्या आणि पूर्ण झालेल्या कामांचा शुभारंभ यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते झाला. या वेळी आमदार नितेश लंके, आ.संग्राम जगताप, आ.लहू कानडे, राष्ट्रवादी काँग्रेस चे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, कॉंग्रेस सरचिटणीस विनायक देशमुख, कर्जत जामखेड विधानसभा प्रमुख प्रा मधुकर राळेभात, सभापती राजश्री ताई मोरे, सुर्यकांत मोरे, राजेंद्र कोठारी, सह अनेक मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना अजित पवार यांनी स्थानिक आणि राज्यस्तरीय विविध मुद्यांना हात घालत टोलेबाजी केली. माजी आमदार राम शिंदे यांच्यावर बोलताना, जनतेने आता रोहितला निवडून दिलंय त्यामुळे आता तुम्ही शांत बसा, तुम्हाला जनतेने का नाकारले याचे आत्मचिंतन करा? उगाच उंटावरून शेळ्या हाकत बसु नका, असा सल्ला दिला. रोहित चांगले काम करतोय तर त्यांचे कौतुक करा, आम्ही नाही का चांगले काम करणाऱ्या गडकरींचे तोंडभरून कौतुक करतो, तसे आता रोहितच्या कामाचे कौतुक करा आणि गमगुमान बसा असा टोला माजी मंत्री प्रा राम शिंदे यांचे नाव न घेता लावला.
एफआरपी वरून पवारांनी एफआरपी न देणाऱ्या साखर कारखान्यांना चांगलेच सुनावले. जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील अंबालिका कारखान्याने अठ्ठावीसशे असा सर्वाधिक भाव दिलाय, इतर अनेक कारखाने अजून एफआरपी देईनात. काहींनी तर दोन वर्षांपासून एफआरपी थकवलेत. असे चालणार नाही. कारखान्यांनी चांगला एकरकमी एफआरपी तातडीने दिला पाहिजे असे अजित पवार म्हणाले.
अजीत पवार यांना त्यांचे भाषण सुरू असताना मध्येच एकाने लाईट टीकत नाही असा प्रश्न विचारला यावर अजित पवार म्हणाले, राज्यात 70 हजार कोटींची विजे बिले थकलेली आहेत. विजेचा अपव्यय वाढलेला आहे. वेळेवर वीज कोणी बंद करत नाही. थकबाकी रकमा भरत नाही. त्यामुळे राज्य सरकारला दगडी कोळसा घेण्यासाठी अडचणी येतात. मीही ऊर्जा खाते पाहिले आहे. मीही त्या खात्याचा मंत्री असतो तरी कठोर भूमिकाच घेतली असती.
ज्या भागात वीज बिल वसुली चांगली तेथे विद्युत उपकरणे विकत घेण्यासाठी जास्त खर्च येत नाही. कोल्हापूर जिल्ह्यात वीज बिल वसुलीत आग्रेसर आहेत. त्यामुळे तेथे विद्युत साहित्य देण्यात महावितरण व राज्य सरकार तयार असते. आपल्याकडे पिकाला पाणी द्याचे म्हणजे संपूर्ण शेताला पाणी दिले जाते. मोटारी तशाच चालू राहतात. शेताला पाणी द्यायचे म्हणजे पिकांच्या मुळांना पाणी देणे आवश्यक आहे. यासाठी शेतकऱ्यांनी आर्थिक शिस्त लावून घेतली पाहिजे. विजेची व पाण्याची बचत केली पाहिजे.
एसटी कर्मचाऱ्यांच्या चिघळलेल्या आंदोलनाला हात घालत, एसटीचे कर्मचारी आपलेच बांधव आहेत. जनताही आपलीच आहे. त्यामुळे यातून मार्ग निघाला पाहिजे. या प्रश्नात आता शरद पवारांनी लक्ष घातले आहे असे सांगत या प्रश्नावर सर्वमान्य तोडगा लवकरच निघेल असे सांगितले.
चौकट
विकिसाने झपाटलेला माणुस म्हणजे रोहित पवार – मंत्री अशोक चव्हाण
आमदार रोहित पवार हा विकासकाने झपाटलेला माणुस आहे. पुढे काय कामे करायची याचे नियोजन व अराखडा रोहित पवारांकडे आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात दोन वर्षे कोरोना संकटात खुप अडचणी आल्या मात्र यावर मात करून महाविकास आघाडी विकासकामे करत आहे. अहमदनगर जिल्ह्यात 98 रस्त्यांसाठी 637 कोटी रुपये मंजूर केले आहेत.