जामखेड प्रतिनिधी
सिंगल फेजचे रोहीत्र चार महिने झाले जळाले त्यामुळे बांधखडक ग्रामपंचायतचा पाणी पुरवठा बंद आहे तरीही गावकरी पिण्याचे पाण्याचे नियोजन इतर ठिकाणावरून करीत होते. मात्र दोन दिवसापासून गावात कोरणा चाचणीत पंचवीस जण बाधीत आढळले आणि पाण्याचे नियोजन कोलमडले त्यामुळे गावकऱ्यांची शासकीय विहिरीवर पाण्यासाठी धावाधाव सुरू झाली.
तालुक्यातील बांधखडक हे गाव सातशे लोकसंख्या वस्तीचे राजकीयदृष्टय़ा अतिशय संवेदनशील असलेल्या गावात पिण्याच्या पाण्यासाठी धावाधाव घेण्याची वेळ आली आहे. गावाला पाणीपुरवठा करणारी विहीर आहे परंतु सिंगल फेज डिपी चार महिन्यांपूर्वी जळाली स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष विजय वारे, ग्रामपंचायत सदस्य शांतीलाल वारे, किशोर वारे, प्रभाकर वारे, बापूसाहेब पवडमल यांनी प्रशासनाकडे पाठपुरावा केला पण रोहीत्र मिळेना ग्रामस्थ एकमेकांना सहकार्य करून बोअर व खाजगी विहिरीतून पाणी घेऊन तहान भागवत होते. पण आता कोरोनाचे रूग्ण वाढत चालले त्यामुळे कोणी कोणाकडे पाण्यासाठी जाईना व गावातील लहान थोरांनी व महिलांनी एक किलोमीटर अंतर असलेल्या ग्रामपंचायत पाणीपुरवठा विहिरीवर जाणे पसंत केले. यामुळे मागील दोन दिवसापासून महिला व मुले पाण्यासाठी पायपीट करत आहे.
मागील वर्षी कोरोना काळात १०० च्या पुढे रूग्ण या गावात होते मात्र दुसऱ्या लाटेत रूग्णसंख्या कमी होती परंतु दोन दिवसापासून गावात घशातील व नाकातील स्त्राव घेण्याचा कॅम्प लागला यामध्ये तब्बल २५ रूग्ण बाधीत निघाले तसेच अनेक जणांचे अहवाल येणे बाकी आहे. त्यामुळे ज्यांच्या कडून पाणी मिळत होते त्यांच्याकडे पाण्यासाठी जायचे लोकांनी बंद केले आणि गावातील पिण्याच्या पाण्याचे नियोजन कोलमडले.
तालुक्यातील ३६ गावात पिण्याच्या पाण्याची टंचाई आहे. याबाबत गटविकास अधिकारी परशुराम कोकणी यांनी दोन दिवसांपूर्वी उपविभागीय अधिकारी अर्चना नष्टे यांच्याकडे टंचाई प्रस्ताव घेऊन तहसिल कार्यालयात ग्रामसेवकाबरोबर गेले होते तेथे तहसीलदार विशाल नाईकवाडे होते. परंतु टंचाईचा निर्णय जाहीर करण्यासाठी भुजल अहवाल, स्थळ पंचनामा आदी घेऊन या असे प्रांताधिकारी अर्चना नष्टे यांनी सांगितले त्यामुळे ३६ गावात तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे.






