


जामखेड पोलिसांनी कत्तली साठी जाणारी जनावरं पकडली .२.६० लाखांचा मुद्देमाल जप्त, तीन आरोपी ताब्यात
जामखेड प्रतिनिधी
गोवंश हत्या बंदी कायदा असतांना गोवंश हत्या होत असल्याचे निदर्शनास रोजच येत आहे .जामखेड पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण व गस्त पथकाने गुरुवारी (दि. २) पहाटे केलेल्या धडक कारवाईत कत्तलीच्या उद्देशाने निर्दयीपणे वाहतूक केली जात असलेल्या गोवंश जातीच्या चार जनावरांची सुटका केली. या कारवाईत पोलिसांनी टाटा ‘एस’ वाहनासह २ लाख ६० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून तीन आरोपींना ताब्यात घेत त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी पहाटे सुमारे ३ वाजता पोलीस कॉन्स्टेबल योगेश दत्तात्रय दळवी, चालक पोलीस कॉन्स्टेबल महादेव मिसाळ, होमगार्ड प्रताप नारायण पवार व कृष्णा कैलास विर हे हाळगाव-नान्नज मार्गावर गस्त घालत होते. नान्नज गुरक्षेत्र हद्दीत त्यांना एक संशयास्पद टाटा ‘एस’ (क्र. एमएच १६ डीपी २८४६) वाहन येताना दिसले. पोलिसांनी वाहन थांबवून तपासणी केली असता त्यामध्ये चार जर्सी जातीच्या गाई अत्यंत दाटीवाटीने व निर्दयीपणे बांधून वाहतूक केली जात असल्याचे आढळून आले.

चौकशीदरम्यान वाहनातील व्यक्तींनी ही जनावरे नान्नज येथून केज (जि. बीड) येथे कत्तलीसाठी घेऊन जात असल्याची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी तानाजी संभाजी नाईक (वय ४०, रा. सुतार गल्ली, खर्डा), सोहेल आझाद कुरेशी (वय २२, रा. इंदिरानगर, नान्नज) व लक्ष्मण बाबासाहेब हाळनवर (वय २९, रा. मोहरी, ता. जामखेड) यांना ताब्यात घेतले.

कारवाईदरम्यान दोन लाख रुपये किमतीचे टाटा ‘एस’ वाहन आणि ६० हजार रुपये किमतीच्या चार जर्सी गाई असा एकूण २ लाख ६० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल योगेश दळवी यांच्या फिर्यादीवरून आरोपींविरुद्ध महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम, १९७६ मधील कलम ५, ९, ११ (बी) तसेच प्राण्यांना क्रूरतेने वागवण्यास प्रतिबंध अधिनियम, १९६० मधील कलम ११ अन्वये जामखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दोन पंचांच्या उपस्थितीत मुद्देमाल जप्त करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार तुकाराम सोनवणे करीत आहेत. पोलिसांच्या या धडक कारवाईमुळे परिसरातील अवैध गोवंश वाहतूक करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.
