

रयत शिक्षण संस्थेच्या उत्तर विभागीय समन्वय समितीवर राजेंद्र कोठारी यांची निवड
जामखेड, प्रतिनिधी
महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या आणि प्रतिष्ठित शैक्षणिक संस्थांपैकी एक असलेल्या रयत शिक्षण संस्थेच्या उत्तर विभागीय समन्वय समितीच्या सदस्यपदी जामखेड येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) चे प्रदेश सरचिटणीस तथा सामाजिक क्षेत्रातील सक्रिय व्यक्तिमत्त्व राजेंद्र सुभाष कोठारी यांची निवड करण्यात आली आहे.
रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिलच्या दि. २५ एप्रिल २०२६ रोजी झालेल्या बैठकीतील ठराव क्र. ८ नुसार ही निवड करण्यात आली असून, संस्थेचे सचिव श्री. विकास देशमुख (Rt. IAS) यांनी अधिकृत पत्राद्वारे याबाबत माहिती दिली आहे.

संस्थेच्या विविध शैक्षणिक, सामाजिक आणि संघटनात्मक उपक्रमांमध्ये राजेंद्र कोठारी यांनी दिलेले सातत्यपूर्ण योगदान, संस्थेप्रती असलेली निष्ठा आणि वेळोवेळी केलेले सहकार्य याची दखल घेत त्यांच्यावर ही महत्त्वपूर्ण जबाबदारी सोपविण्यात आली आहे. विभागीय समन्वय समितीचे सदस्य म्हणून संस्थेच्या कार्यात अधिक सक्रिय सहभाग नोंदवावा, अशी अपेक्षाही संस्थेच्या वतीने व्यक्त करण्यात आली आहे.

राजेंद्र कोठारी यांनी यापूर्वी उत्तर विभागीय सल्लागार सदस्य, श्री नागेश विद्यालय स्थानिक स्कूल कमिटी सदस्य आदी महत्त्वाच्या पदांवर प्रभावीपणे काम केले आहे. ग्रामीण व शहरी भागातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण उपलब्ध व्हावे यासाठी त्यांनी संस्थेला वेळोवेळी मार्गदर्शन व सहकार्य केले आहे. विषेश म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष खासदार शरदचंद्र पवार यांचे एकनिष्ठ आणि विश्वासू कार्यकर्ते म्हणून राजेंद्र कोठारी यांची ओळख आहे. त्यांच्या संघटन कौशल्यासह सामाजिक कार्याची दखल घेत ही निवड करण्यात आल्याचे मानले जात आहे.
ही निवड संस्थेचे अध्यक्ष खासदार शरदचंद्र पवार, खासदार सुप्रिया सुळे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, संस्थेचे चेअरमन चंद्रकांत दळवी, उत्तर विभागीय अध्यक्ष आमदार रोहित पवार, संस्थेचे उपाध्यक्ष अरुण कडू पाटील तसेच ज्येष्ठ नेते दादाभाऊ कळमकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे.

राजेंद्र कोठारी यांच्या निवडीमुळे जामखेड तालुक्याच्या शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील प्रतिनिधित्व अधिक भक्कम झाले असून विविध राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि सहकार क्षेत्रातील मान्यवरांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. त्यांच्या अनुभवाचा लाभ संस्थेच्या कार्यविस्तारासाठी होईल आणि उत्तर विभागातील शैक्षणिक उपक्रमांना नवी दिशा मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.









