
जनकल्याण महामार्ग कल्याण-लातुर हा पाटोदा-साकत-जामखेड यामार्गे करण्यात यावा – उपसभापती कैलास वराट
पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना दिले निवेदन
जामखेड प्रतिनिधी
जनकल्याण महामार्ग कल्याण-लातुर हा पाटोदा-साकत-जामखेड यामार्गे करण्यात यावा यासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती तथा संचालक कैलास वराट यांनी नुकतेच पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना निवेदन देऊन मागणी केली आहे. हा रस्ता पाटोदा साकत मार्गे गेल्यास मराठवाडा व पश्चिम महाराष्ट्राची दळण वळणाची सुविधा वाढण्यास मदत होऊन व्यापार व युवकांना रोजगार प्राप्त होणार आहेत.

जनकल्याण महामार्ग कल्याण-लातुर हा नियोजित लातुर-अंबाजोगाई-केज – मांजरसुंबा- पाटोदा- साकत- जामखेड- आष्टी या भागातुन जात आहे. परंतु धाराशिव जिल्ह्यातील काही नेते मंडळी हा मार्ग आपल्या जिल्ह्यातुन वळविण्याचा जोरदार प्रयत्न करित आहेत. म्हणून आज माननिय नामदार राधाकृष्ण विखेपाटील जलसंपदा मंत्री महाराष्ट्र शासन तथा पालकमंत्री अहिल्यानगर हे जामखेड दौर्यावर आले असता कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती तथा संचालक कैलास वराट सर यांनी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची भेट घेऊन नियोजीत महामार्ग हा अंबाजोगाई- केज- मांजरसुंबा- पाटोदा- साकत- जामखेड- आष्टी या मार्गे झाल्यास महामार्गाचे आंतर कमी होणार असुन लागणारा पैसा कमी होणार आहे. तसेच भविष्यात प्रवासासाठी लागणार्या वेळेची बचत होणार आहे. तसेच परिसरातील युवकांना रोजगार प्राप्त होण्यास मदत होणार आहे. तरी जनकल्याण महामार्ग कल्याण-लातुर हा या नियोजित मार्गानेच व्हावा यासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती तथा संचालक कैलास वराट यांनी निवेदन दिले. यावेळी जिल्हा बँकेचे संचालक अमोल राळेभात, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सुधिर राळेभात, संचालक विठ्ठल चव्हाण, किसनराव ढवळे, भारत काकडे, अंकुश कोल्हे, महादेव डीसले, श्रीकृष्ण पुलावळे, आशोक नेमाने इत्यादी उपस्थित होते.








