जामखेड तालुक्यात माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक क्षमता वृध्दी प्रशिक्षण पहिला टप्पा संपन्न
जामखेड प्रतिनिधी
तालुक्यातील शिक्षकांमध्ये अनेक बाबी सकारात्मक आहेत त्या बाबींवर फोकस केला. त्या पुढे आणल्या यामुळे शिक्षकांनीही अंग झटकून काम केले यामुळे जामखेड तालुक्याची शैक्षणिक गुणवत्ता वाढली आहे असे मत गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे यांनी व्यक्त केले.
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 शिक्षक क्षमता वृध्दी प्रशिक्षण कार्यक्रमाचा तालुकास्तरीय पहिला टप्पा नुकताच संपन्न झाला. यावेळी समारोपाच्या अध्यक्षस्थानी गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे बोलत होते. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे जामखेड महाविद्यालय जामखेडचे प्राचार्य डॉ. एम. एल. डोंगरे, प्रा. युवराज भोसले होते.
यावेळी बोलताना गटशिक्षणाधिकारी म्हणाले की, माध्यमिक शिक्षक हे नम्र व चांगले काम करणारे आहेत. संस्थेचा त्यांच्यावर वचक असतो. आपल्या चांगल्या कामाची नोंद कोठेना कोठे निश्चित पणे होत असते तेव्हा चांगले काम करा. विद्यार्थी हेच आपले दैवत समजून काम करा असा सल्ला दिला तसेच प्रशिक्षणाविषयी सविस्तर माहिती दिली.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून जामखेड महाविद्यालयाचे प्राचार्य प्राचार्य एम. एल. डोंगरे यांनी शिक्षकांना मार्गदर्शन करताना सांगितले की, शिक्षण सतत चालणारी प्रक्रिया आहे. शिक्षकांनी नवनवीन माहिती साठी सतत अपडेट राहिले पाहिजे. प्रशिक्षण हि संधी समजून काम केले पाहिजे. चांगल्या गोष्टी कौशल्यातून साध्य करता येतात. शिक्षकांनी चौकटीबाहेर जाऊन काम करावे लागेल तेव्हा सर्व विद्यार्थ्यांचा सर्वागीण विकास होणार आहे. आपल्याला दुत म्हणून काम करावयाचे आहे. कोऱ्या पाठीवर चांगले संस्कार करावयाचे आहेत. टीचिंग, लर्निंग, इव्हँलेशन हव्या आहेत. संधी मिळाली कि, संधीचे सोने करता येते.
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 लागू करण्यात आले आहे. या धोरणामुळे शिक्षक सक्षमीकरणावर विशेष भर देण्यात आला आहे. प्रत्येक मूल शिकले पाहिजे, त्याचा सर्वागीण विकास झाला पाहिजे. यासाठी शिक्षकांनी नवनवीन विचारप्रवाह, विषयज्ञान, अध्यापनशास्त्र विविध धोरणे विषयी अद्ययावत असणे आवश्यक आहे. शिक्षकांचा सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास होण्याच्या दृष्टीने शैक्षणिक वर्षामध्ये किमान पन्नास तासाचे प्रशिक्षण अपेक्षित आहे. शिक्षण व्यवस्थेत आता 10+2 ऐवजी 5+3+3+4 या सूत्रानुसार असणार आहे. शिक्षक होण्यासाठी आता बारावी नंतर चार वर्षांचा बीएड अभ्यासक्रम पूर्ण करावा लागणार आहे.
यावेळी प्रशिक्षणाविषयी आपल्या तीन दिवसांच्या अनुभवाचे कथन प्रशिक्षणार्थी मोहळकर सर, गोपाळघरे मँडम, ठाकरे सर, विधाते सर, इंगळे सर यांनी केले तर सुलभक म्हणून सुदाम वराट यांनी आपले मत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार नागरगोजे सर यांनी केले