
धक्कादायक! भीमा नदीत आढळलेल्या ‘त्या’ सात जणांची हत्याच; चार चुलत भावांनी मिळून केले हत्याकांड
दौंड : पुण्यातील दौंड तालुक्यातील पारगाव येथे भीमा नदीत सात जणांचे मृतदेह आढळून आले होते. या सात जणांच्या मृत्यू प्रकरणी धक्कादायक माहिती पुढे आली आहे. त्यांची आत्महत्या नसून खून झाल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणी चौघांना अटक करण्यात आली आहे.

पुण्यात भीमा नदीत तब्बल एकाच कुटुंबातील सात जणांचे मृतदेह आढळले होते. मुलगी पळून गेल्याने समाजात बदनामी होण्याच्या भीतीने त्यांनी आत्महत्या केल्याचे प्राथमिक तपासात पुढे आले होते. मात्र, त्यांची आत्महत्या नसून चार चुलत भावांनी मिळून हे हत्याकांड घडून आणल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. या प्रकरणी चौघांना अटक करण्यात आली आहे.

भीमा नदीत आढळलेल्या सात मृतदेहांचे गूढ उलगडले; चक्रावून टाकणारे सत्य समोर
पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील परगाव येथील नदीत गेल्या चार दिवसांपासून मृतदेह सापडत होते. मंगळवारी ३ मुलांचे मृतदेह देखील सापडले होते. एकाच कुटुंबातील तब्बल ७ जणांचे मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली होती. मोहन उत्तर पवार (वय, ५०) आणि संगीता मोहन पवार (वय, ४५) त्यांची मुलगी राणी शामराव फुलवरे (वय, २७ वर्ष) जावई शामराव पंडित फुलवरे आणि नातू मुले रितेश फुलवरे (वय,७ वर्ष), छोटू फुलवरे (वय, ५ वर्ष) आणि कृष्णा फुलवरे (वय, ३ वर्ष) यांचे मृतदेह भीमा नदीपात्रात आढळून आले. दरम्यान, त्यांची आत्महत्या की घातपात या बाबत चर्चा सुरू होती. सुरुवातीला पोलिसांना हा घातपात असल्याचा संशय आला. पण मुलगी पळून गेली म्हणून या सात जणांनी आत्महत्या केल्याची पोलीस चौकशीत उघड झाले होते.

पोलिसांनी दिलेल्या महितीनुसार आरोपीच्या मुलाचा अपघात करुन मयताने खून केलाचा संशयातून या ७ जणांची हत्या करुन त्यांचे मृतदेह हे भिमा नदी पात्रात फेकले असल्याचे तपासात समोर आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी अशोक कल्याण पवार (वय ४०), श्याम कल्याण पवार (वय ३०), प्रकाश कल्याण पवार (वय ३२) आणि आणखी एक त्यांचा भाऊ अशा चौघांना ताब्यात घेतले आहे.

मोहन पवार यांचे आरोपी हे सख्खे चुलत भाऊ आहेत. मोहन पवार यांच्या मुलासोबत आरोपींचा एक मुलगा दुचाकीवर काही दिवसांपूर्वी गेला असताना त्याचा अपघात झाला होता. या घटनेत सदर मुलगा गंभीर जखमी होऊन त्याच्यावर रुग्णालयात उपचार करण्यात येत होते. मात्र, चार दिवस ही बाब पवार कुटुंबाने मुलाच्या पालकांना सांगितले नव्हती. या घटनेत दुर्दैवाने मुलाचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला.
मुलाचा खून हा पवार कुटुंबीयांनी केल्याचा संशय चुलत भावांना होता. या रागातून त्यांनी बदला घेण्याचा कट रचला. घटनेच्या दिवशी आरोपींनी चुलत भाऊ मोहन पवार व त्याच्या कुटुंबियांना गावाला जाऊ असे सांगितले आणि गाडीत बसवले. त्यानंतर ते भीमा नदी पात्राच्या जवळ गेले आणि त्यांनी सदर सात जणांना मारून त्यांचे मृतदेह भीमा नदी पात्रात फेकून दिले आणि पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला.
नेमके कशाप्रकारे आरोपींनी मयताना मारले, त्यांच्या खुना मागे नेमके अजून कोणते इतर कारण आहे, याबाबत पुणे ग्रामीण पोलीस यांची स्थानिक गुन्हे शाखा तपास करत आहे.







