श्रीगोंदा प्रतिनिधी
श्रीगोंदा तालुक्यातील बेलवंडी जवळ दौंड कडुन मनमाड कडे जाणाऱ्या मालगाडीचे १२ डबे पहाटे च्या सुमारास घसरले. या मध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र दौंड मनमाड रेल्वे मार्गावरील वाहतूक सध्या ठप्प झाली आहे.
बुधवार दि २४ डिसेंबर रोजी पहाटे श्रीगोंदा स्टेशनपासून अगदी नजीक तीन किलोमीटर अंतरावर दौंडकडून नगरच्या दिशेने जाणाऱ्या मालवाहतूक करणाऱ्या रेल्वेचे १२ डबे रुळावरून घसरल्याने मोठा अपघात झाला. मालवाहतूक करणारी रेल्वे असल्याने कोणतीही जीवीतिहानी किंवा कुणीही यात जखमी झालेले नाही. परंतु रेल्वे रुळांचं मात्र मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असून या रेल्वे अपघातामुळे दौंड नगर रेल्वे मार्गावरील रेल्वे वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. या अपघातानंतर या मार्गावरील सर्व रेल्वेगाड्या मागील स्टेशनवरच रोखण्यात आल्या आहेत. सिमेंट वाहतूक करणाऱ्या या मालवाहतूक गाडीला ४२ डबे होते त्यातील १२ डबे रुळावर घसरले सदर घटनेबाबत बेलवंडी व श्रीगोंदा पोलिसांना माहिती मिळाली त्यानंतर पेट्रोलिंग करणाऱ्या पो उपनिरीक्षक गट, व पो कॉ प्रकाश मांडगे यांनी अपघातस्थळी धाव घेतली रेल्वेमार्ग दुरुस्त होण्यास वेळ लागणार असल्यामुळे या मार्गावरील रेल्वे वाहतूक बऱ्याच वेळेसाठी ठप्प राहणार आहे. आपघाताचे कारण मात्र अद्याप समजु शकले नाही.