मुंबई: इंदौरहून पुण्याला येत असलेल्या एसटी महामंडळाच्या बसचा सोमवारी मध्य प्रदेशात अपघात झाला. धार जिल्ह्यातील घागरगाव येथे ही बस थेट नर्मदा नदीत कोसळली. यामध्ये १३ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. ही बस पुण्याला येत असल्यामुळे यामध्ये महाराष्ट्रातील किती प्रवासी होते, हा प्रश्न आता उपस्थित झाला आहे.

या पार्श्वभूमीवर एसटी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, एसटी महामंडळाची (ST Bus) ही बस जळगाव जिल्ह्यातील होती. सकाळी साडेसात वाजता ही बस इंदौरहून निघाली होती. ही बस अंमळनेरला येणार होती. मात्र, धार जिल्ह्यात नर्मदा नदीच्या पुलावरून जात असताना या बसचा अपघात झाला, असे शेखर चन्ने यांनी सांगितले.

या एसटी बसमध्ये महाराष्ट्रातील नेमके किती आणि कोणते प्रवासी याची माहिती अद्याप आमच्याकडे नाही. आम्ही लवकरच सविस्तर माहिती देऊ. तसेच मृतांच्या आणि जखमींच्या कुटुंबीयांना माहिती घेण्यासाठी हेल्पलाईनही सुरु करण्यात येईल, असे चन्ने यांनी सांगितले. सध्या धार जिल्ह्यात नर्मदा नदीत एसटीतील उर्वरित प्रवाशांन वाचवण्यासाठी बचावकार्य सुरु आहे. आम्ही या सगळ्याबाबत लवकरच सविस्तर माहिती देऊ, असे एसटी महामंडळाकडून सांगण्यात आले.

या भीषण अपघातामध्ये आतापर्यंत १३ जणांचा मृत्यू झाला असून १५ जणांना वाचवण्यात यश आलं आहे.बस इंदौरहून पुण्याला जात होती. नर्मदा नदीच्या पुलावर ब्रेक फेल झाल्याने हा अपघात झाला. तपासानंतरच परिस्थिती स्पष्ट होईल. ते म्हणाले की, नदीचा प्रवाह अतिशय वेगवान आहे. बसमध्ये ५०-५५ जण होते, असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. त्यामुळे मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती वर्तविली जात आहे.





