महाड : रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातुन धक्कादायक घटना समोर येतीये. ढालकाठी बिरवाडी गावातील महिलेने सहा मुलांना विहिरीत फेकून दिले. या घटनेत सहाही मुलांचा करुण अंत झाला आहे. मन हेलावणारी ही घटना आहे. धक्कादायक घटनेने जिल्हा हादरला आहे. नवऱ्याबरोबर झालेल्या भांडणा च्या रागातून महिलेने हे कृत्य केल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.
जाहीरात
मात्र अद्याप तपास यंत्रणांनी याला दुजोरा दिलेला नाही. रुना चिखुरी सहानी (30) असे या आईचे नाव आहे तर चिखुरी सहानी असे पतीचे नाव आहे. सर्व मुलांचे मृतदेह बाहेर काढण्यास बचाव पथका ला यश आले आहे. आरोपी महिला रुना आणि पती चिखुरी हे दोघेही महाड एमआयडीसी पोलिस ठाण्यात हजर झाले आहेत. शवविच्छेदन आणि इतर कायदेशीर प्रक्रियेनंतर मुलांचे मृतदेह बिरवाडी प्राथमिक आरोग्य केंद्रात आणण्यात आले. याप्रकरणी महाड एमआयडीसी पोलिस अधिक तपास करीत आहेत.
जाहीरात
आधी मुलांना ढकलले, मग स्वतः उडी घेतली
महाड येथील ढालकाठी गावात सदर महिला पती आणि सहा मुलांसह राहत होती. महिलेचा पती चिखुरी हा दररोज दारु पिऊन यायचा आणि महिलेला त्रास देत असे. पतीच्या या त्रासाला कंटाळेल्या या महिलेले सोमवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास हे टोकाचे पाऊल उचलले. तिने आपल्या सहाही मुलांना विहिरीत ढकलून दिले. पाच मुली आणि एका मुलाला आधी विहिरीत ढकलून दिले. त्यानंतर तिने देखील उडी मारली. मात्र याचवेळी जवळच्या आदिवासींनी तिला पाहिले आणि विहिरीतून बाहेर काढले आणि वाडीत आणले. यावेळी तिने हकीकत सांगितल्यानंतर सर्वांना धक्का बसला. महिलेचा जीव वाचला असला तरी सहा लहान मुलांचा नाहक जीव गेला आहे. सदर कुटूंब परराज्यातील असून ते ढालकाठी येथे उदरनिर्वाह करण्यासाठी आल्याचे समजते. दरम्यान, या घटनेमुळे महाडमध्ये खळबळ उडाली आहे.
महाड तालुक्यातील खरवली बोरगाव हद्दीमधील ही घटना असून प्राथमिक मिळालेल्या माहितीनुसार मुलांचे मृतदेह हाती लागले आहेत स्थानिक आमदार भरतशेठ गोगावले घटनास्थळी पोहोचले आहेत. पोलीस यंत्रणेने स्थानिक ग्रामस्थांच्या सहकार्याने मृतदेह बाहेर काढण्याचे काम सुरू केले. संबंधित महिलेला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.







