संगमनेर प्रतिनिधी
सतत मोबाईल वापरते या कारणावरून वडील रागावल्याने संतापलेल्या पंधरा वर्षीय मुलीने मुळा नदी पात्रात आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आला. गुरुवारी सकाळी घारगाव येथे हा प्रकार समोर आला असून अक्षदा विकास वाघ (रा. आंबी खालसा, ता. संगमनेर) असे या मुलीचे नाव आहे.
यासंदर्भात पोलिस यंत्रणेकडून मिळालेली माहिती अशी विकास वाघ हे मोलमजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. त्यांची पंधरा वर्षे वयाची मुलगी अक्षदा ही गावातील शाळेत इयत्ता नववीमध्ये शिक्षण घेत होती. मुलगी अक्षदा सतत मोबाईल मध्ये व्यस्त राहत असल्याने बुधवारी रात्री तिचे वडील तिच्यावर रागावले होते. याचा राग आल्याने ती रात्री अकरा वाजण्याच्या दरम्यान घरात कोणालाही काहीही न सांगता घरातून निघून गेली होती.
कुटुंबियासह नातेवाईकांनी रात्रभर या मुलीचा शोध घेतला मात्र ती कोठेही आढळून आली नाही. दरम्यान गुरुवारी (ता. १४) सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास मुळा नदीपात्रामध्ये पुलाखाली तिचा मृतदेह आढळून आला. घटनास्थळी घारगाव पोलिसांनी भेट देत ग्रामस्थांच्या मदतीने मृतदेह पाण्याबाहेर काढला. मृतदेहाची ओळख पटविण्यात आली असून हा मृतदेह शवविच्छेदनासाठी संगमनेरमध्ये आणण्यात आला. एकनाथ बाळू शिंदे (रा. आंबीखालसा ता. संगमनेर) यांनी दिलेल्या माहितीवरून घारगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. अधिक तपास पोलीस नाईक राजेंद्र लांघे करत आहे.






