जामखेड प्रतिनिधी
राज्यातील कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सालाबादाप्रमाणे होणारी जामखेड येथील नागपंचमीची यात्रा याही वर्षी रद्द करण्यात आली असून पंचमीच्या दिवशी म्हणजेच शुक्रवार दि. १३ आॅगस्ट रोजी जामखेड शहरात जनता कर्फ्यू असणार आहे. यामुळे जामखेड शहर शुक्रवार, शनिवार व रविवारी असे सलग तीन दिवस पुर्णपणे बंद ठेवण्यात येणार असल्याचा निर्णय प्रशासनाच्या वतीने कळविण्यात आले आहे.
दि. १० आॅगस्ट रोजी जामखेड येथील तहसील कार्यालयात शांतता कमीटीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी हा निर्णय घेण्यात आला आहे. यावेळी जेष्ठ नेते प्रा. मधुकर राळेभात, पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड, नायब तहसीलदार नवनाथ लांडगे, मुख्याधिकारी मिनीनाथ दंडवते, माजी नगरसेवक अमित चिंतामणी, शिवसेना तालुकाप्रमुख संजय काशीद, पॉलिटेक्निक काॅलेजचे प्राचार्य विकी घायतडक, शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संघटनाचे पांडुरंग भोसले, सामाजिक कार्यकर्ते विकीभाऊ सदाफुले, पवन राळेभात, डिगांबर चव्हाण, दिपक सदाफुले, अमित जाधव यांच्यासह शांतता कमीटीचे सदस्य उपस्थित होते.
राज्यात असलेल्या कोरोना निर्बंधांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्वच यात्रा उत्सव रद्द करण्यात आले आहेत. त्याच पार्श्वभूमीवर प्रतिवर्षी प्रमाणे होणारी जामखेड येथील नागपंचमीची यात्रा सलग दुसऱ्यांदा रद्द करण्यात आली आहे. मात्र यात्रे निमित्त निघणारी पालखी थोड्याच नागरिकांच्या उपस्थित निघणार आहे.
तरी नागरिकांनी कुठेही गर्दी न करता वैयक्तिक पातळीवर हा सण साजरा करावा असे आवाहन प्रशासन व शांतता कमिटी सदस्यांच्या वतीने करण्यात आले आहे. नेहमीच प्रमाणे आत्यावशक सेवा सुरू राहणार असून त्याबाबत नवीन कोणताही निर्णय झालेला नाही.