


जामखेड प्रतिनिधी
जामखेड तहसील कार्यालयात जगद्ज्योती महात्मा बसवेश्वर यांची ८९५ वी जयंती रविवार (दि. १९ एप्रिल २०२६) रोजी सकाळी १० वाजता उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. यावेळी महात्मा बसवेश्वर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी शिवसेनेचे युवा नेते आकाश बाफना यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, महात्मा बसवेश्वर यांनी दिलेला समानता, बंधुता आणि सामाजिक न्यायाचा संदेश आजही समाजासाठी दिशादर्शक आहे. समाजातील भेदभाव नष्ट करून सर्वांना समान हक्क मिळवून देण्यासाठी त्यांनी आयुष्यभर कार्य केले. त्यांच्या विचारांचा वारसा जपणे ही आपली सामूहिक जबाबदारी असल्याचे त्यांनी सांगितले.

वीरशैव लिंगायत समाजाचे अध्यक्ष बजरंग सरडे म्हणाले की, महात्मा बसवेश्वर हे खऱ्या अर्थाने समाज परिवर्तनाचे महान विचारवंत होते. “प्रत्येक माणूस समान आहे” हा विचार त्यांनी समाजात रुजवला. आजच्या पिढीने त्यांच्या विचारांचे अनुकरण करून समाजात एकोपा, प्रामाणिकपणा आणि मानवतेची जपणूक करणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी बजरंग सरडे, राहुल लोहकरे, आकाश बाफना, ज्येष्ठ सेवक अरुण गुड, अमोल लोहकरे, महसूल निवडणूक अधिकारी सचिन आगे यांच्यासह शिवकुमार डोंगरे, महेश नगरे, प्रविण होळकर, संजय सरडे, जगदीश मेनकुदळे, नाना काथवटे, प्रशांत गुळवे, दिपक ढोले, विजय डोंगरे, हरिश ढोले, दत्ता चऱ्हाटे, सागर लोहकरे, अमरनाथ डोंगरे, विठ्ठल परांडकर, सुदर्शन सुरोडे, संजय टेकाळे, शिवरुद्र मेनकुदळे आदी मान्यवर उपस्थित होते.

जामखेड नगर परिषदेतही अभिवादन
जामखेड नगर परिषद कार्यालयातही महात्मा बसवेश्वर जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या कार्यक्रमास मुख्याधिकारी अजय साळवे, नगराध्यक्षा प्रांजल चिंतामणी, भाजपा गटनेते तात्याराम पोकळे, प्राचार्य तथा नगरसेवक विकी घायतडक, माजी नगरसेवक अमित चिंतामणी, स्वराज्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रविण होळकर तसेच अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
मुख्याधिकारी अजय साळवे यांनी आपल्या भाषणात सांगितले की, महात्मा बसवेश्वर यांनी लोकशाहीवादी विचारांचा पाया घातला. त्यांनी मांडलेली ‘अनुभव मंटप’ ही संकल्पना सर्वसमावेशक लोकशाहीचे प्रतीक असून, जात-धर्म, स्त्री-पुरुष भेद न करता सर्वांना समान प्रतिनिधित्व देणारी आहे. आजचे लोकप्रतिनिधी त्यांच्या विचारांचा वारसा पुढे नेत असल्याचे त्यांनी सांगितले.
नगराध्यक्षा प्रांजल चिंतामणी यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, महात्मा बसवेश्वर यांनी दिलेला समानता व सामाजिक न्यायाचा संदेश आजही तितकाच प्रेरणादायी आहे. समताधिष्ठित समाज घडविण्यासाठी त्यांच्या विचारांचे आचरण करणे आवश्यक असून, शहराच्या विकासात प्रत्येक घटकाचा सहभाग महत्त्वाचा आहे.




