


जामखेड तालुक्यात अतिवृष्टीचा दुसरा बळी, आठ दिवसाच्या उपचारानंतर सावरगाव येथील व्यक्तीचा मृत्यू
जामखेड प्रतिनिधी
जामखेड तालुक्यातील सावरगाव येथे मागिल आठवड्यात अतिवृष्टीमुळे घराची भिंत पडून एकाच कुटुंबातील तीन जण जखमी झाले होते. यामध्ये आठ दिवसाच्या उपचारानंतर सावरगाव येथील एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. यापुर्वी पिंपळगाव उंडा येथील एका वृद्ध महीलेच्या अंगावर भिंत कोसळून मृत्यू झाला होता. आता अतिवृष्टीचा जामखेड तालुक्यात हा दुसरा बळी गेला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की जामखेड तालुक्यातील सावरगाव येथे दि 22 सप्टेंबर रोजी रात्री गौतम बाबासाहेब गोरे हे रात्री आपल्या घरात कुटुंबासमवेत झोपलेले असताना रात्री साडेचार वाजता त्यांच्या घराची कोसळली होती. या अपघातात सावरगाव येथील गौतम बाबासाहेब गोरे (वय 40), पत्नी सोनाली गौतम गोरे (वय 35) व मुलगा सार्थक गौतम गोरे (वय 14) हे जखमी झाले होते. मात्र यातील मयत गौतम गोरे हे गंभीर जखमी झाले असल्याने त्यांच्यावर गेल्या आठ दिवसांपासून अहिल्यानगर येथील हॉस्पिटल मध्ये उपचार सुरू होते. मात्र आठ दिवसांच्या उपचारानंतर काल मंगळवार दि 30 सप्टेंबर 2025 रोजी रात्री त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

यानंतर पाच दिवसानं शनिवार दि 27 रोजी पिंपळगाव उंडा येथे रात्री साडेअकरा वाजता किसन गव्हाणे व पारूबाई किसन गव्हाणे हे वृध्द पती पत्नी आपल्या पत्र्याच्या घरात झोपले होते. सतत पाऊस चालू असल्याने शेजारच्या जून्या इमारतीचा भींतीचा भाग त्यांच्या पत्र्याच्या घरावर कोसळला. त्यात मयत पारूबाई गंभीर जख्मी झाल्या त्यांना तातडीने रात्री बारा वाजता जामखेड येथील समर्थ हॉस्पिटलला उपचारासाठी आणले असता त्यांना डॉक्टरांनी मयत घोषित केले होते.
जामखेड तालुक्यात मागिल आठ दिवसात मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी झाली आहे. अनेक घरांची पडझड, जनावरे मृत्यूमुखी झाली, तसेच शेती व पिकांचे नुकसान झाले असल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. सावरगाव व पिंपळगाव उंडा येथे दोन जणांचा मृत्यू झाला असल्याने आता अतिवृष्टीचा जामखेड तालुक्यात हा दुसरा बळी गेला आहे.









