

दुर्दैवी घटना! आईसोबत कपडे धुण्यासाठी गेलेल्या 3 मुली व आई अशा एकूण चौघांचा तलावात बुडून मृत्यू
सांगली, 10 ऑक्टोबर :
सांगली जिल्ह्यातील बिळुर गावातून एक अतिशय हृदयद्रावक घटना समोर आली आहे. यात तलावात बुडून आई आणि तीन मुलींचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या चौघीही तलावात कशा पडल्या याबद्दलची माहिती अद्याप समजू शकलेली नाही.


मात्र, तलावाच्या शेजारीच काही कपडे आणि कपडे धुण्याचा साबण आढळून आला आहे. यावरुन त्या कपडे धुण्यासाठी तलावाजवळ गेल्या असल्याचं सांगितलं जात आहे. या घटनेनंतर चौघींचेही मृतदेह तलावातून बाहेर काढण्यात आले असून त्यांचे मृतदेह जतच्या ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले आहेत.


या घटनेबाबत पोलीस अधिक तपास करीत आहेत. सुनीता माळी (वय 30), अमृता माळी (वय 13), अश्विनी माळी (वय 10), ऐश्वर्या माळी (वय 7) अशी मयत झालेल्यांची नावे आहेत. मात्र हा अपघात आहे की घातपात? हे अद्यापही समजू शकलेलं नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, सुनीता माळी या आपल्या मुलींसह कपडे धुण्यासाठी तलावावर गेल्या होत्या. मात्र, त्या घरी परतल्याच नाहीत. रविवारी रात्री या चौघींचेही मृतदेह तलावाच्या पाण्यात आढळून आले. यानंतर गावकऱ्यांनी पोलिसांना याबाबतची माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले.

यानंतर महिलेसह तिन्ही मुलींचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आले. मात्र, या चौघींचाही मृत्यू नेमका कशामुळे झाला. त्यांच्यासोबत हा अपघात घडला की काही घातपात झाला याबाबतचा तपास आता पोलीस करत आहेत. मात्र, एकाचवेळी चौघींचा अशाप्रकारे मृत्यू झाल्याने गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.







