डॉ भास्कर मोरेच्या रत्नदीप मेडिकल फाउंडेशन फार्मसीच्या सहा लॅब सील
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सत्यशोधन समितीने केली कारवाई
जामखेड प्रतिनिधी
गेल्या पाच दिवसांपासून रत्नदीप मेडिकल फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. भास्कर मोरे यांच्या विरोधात शेकडो विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू आहे. नुकताच भास्कर मोरेवर विनयभंगाचा गुन्हाही दाखल झाला आहे. शुक्रवारी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सत्यशोधन समितीने तहसीलदार, पोलीस निरीक्षक, अखिल भारतीय विद्यार्थी परीषद, विद्यार्थी, पालक, पत्रकार यांच्या उपस्थितीत काही गोष्टी संशयास्पद वाटल्याने फार्मसी लॅबला सील ठोकले आहे. यामुळे आता भास्कर मोरे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.
पाच दिवसांपासून रत्नदीप मेडिकल फाउंडेशनच्या शेकडो विद्यार्थ्यांचे भास्कर मोरे विरोधात आंदोलन सुरू आहे. मोरे हे आर्थिक, मानसिक, शारीरिक त्रास देतात याबाबत तहसीलदार यांना निवेदन दिले होते. व जोपर्यंत विद्यापीठाची समिती येत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असा पवित्रा विद्यार्थ्यांनी घेतला होता. डॉ. भास्कर मोरे विरोधात काल उशिरा गुन्हाही दाखल झाला आहे.
विद्यार्थ्यांच्या आंदोलनाची दखल घेत आज सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची सत्यशोधन समिती काल जामखेडला आली होती. यामध्ये अमोल घोलप, डॉ. संदीप पालवे अध्यक्ष, डॉ. डी. वाय दामा या कमिटीच्या सदस्यांनी जामखेड येथे येत आंदोलन कर्ते विद्यार्थी, पालक, ग्रामस्थ, अखिल भारतीय विद्यार्थी परीषद व विविध संघटनांचे प्रतिनिधी यांच्या बरोबर चर्चा केली. विद्यार्थ्यांनी तीव्र भावना व्यक्त केल्या होत्या यानुसार कमिटी तहसीलदार गणेश माळी, नायब तहसीलदार महेश अनारसे, पोलीस निरीक्षक महेश पाटील यांच्या समवेत रत्नदीप मेडिकल कॉलेज मध्ये तपासणी केली.
तपासणी मधे अनेक गोष्टी संशयास्पद आढळल्या असे समितीचे मत आहे. काॅलेजला कायम प्राचार्य नाहीत, शिक्षक स्टाफ नाही, हजेरी नाही, कागदपत्रे नाहीत ज्या क्लास रूममध्ये क्लास भरतो तेथे अनेक दुसरे क्लासही भरतात, काॅलेज ग्रंथालय, लॅब, कॅटिंग, या ठिकाणी अनेक मटेरियल एक्सपायरी झालेले आढळले, सगळीकडे धुळ, जाळ्या आढळल्या, सकाळी वेगळा वर्ग, दुपारी फार्मसी, सायंकाळी वेगळा क्लास एकाच रुममध्ये भरतो. अनेक साहित्य असे आढळले ते वापरात येत नाही. तेव्हा सर्व कमिटी सदस्यांच्या एकमताने फार्मसी लॅब सह इतर सहा लँबला सील करण्यात आले आहे. आम्ही आमचा प्राथमिक अहवाल विद्यापीठाला देणार आहोत विद्यापीठ याबाबत निर्णय घेईल असे कमिटीने सांगितले.
दोन ते तीन दिवसात विद्यापीठाने विद्यार्थींच्या बाजुने निर्माण द्यावा. या कॉलेजच्या विद्यार्थींना अन्य महाविद्यालयात प्रवेश देऊन त्या विद्यार्थींच्या शैक्षणिक जडणघडणेची जबाबदारी विद्यापीठाने घ्यावी. कॉलेज प्रशासनाचा व संस्था चालकांचा हस्तक्षेप लक्षात घेता महाविद्यालयाची विद्यापीठ संलग्नता रद्द करावी अन्यथा अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या आंदोलनाला सामोरे जावे लागेल असा इशारा अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे प्रदेश सहमंत्री अमोघ कुलकर्णी यांनी दिली.
विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला मनसे, शिवप्रतिष्ठान हिंदुस्तान, संभाजी ब्रिगेड, रिपब्लिकन पक्ष, राष्ट्रीय समाज पक्ष, भाजप व राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट यांच्या सह अनेक सर्वपक्षीय नेत्यांनी जाहीर पाठिंबा दिला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here