मराठा आंदोलनाला मोठं यश! सरकारकडून सर्व मागण्या मान्य, मनोज जरांगे पाटील लवकरच सोडणार उपोषण
मंबई : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर आंदोलक मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला मोठं यश मिळालं आहे. राज्य सरकारने मनोज जरांगे पाटील यांच्या जवळपास सर्व मागण्या मान्य केल्याचं माहिती समोर आली आहे. त्यामुळे मराठा समाजाकडून राज्यभरात जल्लोष केला जात आहे.
सरकारच्या शिष्टमंडळासोबतच्या यशस्वी चर्चेनंतर मराठा आरक्षणाचे कार्यकर्ते मनोज जरंगे पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चांगले काम केले आहे. आमचा विरोध आता संपला आहे. आमची विनंती मान्य करण्यात आली आहे. आम्ही त्यांच्याकडून पत्र स्वीकारू. आज (शनिवारी) मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मी ज्यूस पिऊन उपोषण मागे घेईल अशी माहिती दिली.
दरम्यान यापूर्वी रात्री उशीरापर्यंत मनोज जरांगे आणि सरकारचे शिष्ठमंडळ यांच्यात जवळपास तीन तास चर्चा झाली. यानंतर शिष्टमंडळाकडून मनोज जरांगे यांना सगेसोयरे यांच्याबाबतचा अध्यादेश सुपूर्द करण्यात आला. तसेच यावेळी जरांगे यांच्या तीनही मागण्या मान्य करण्यात आल्या. त्यामुळे आज (शनिवार) सकाळी मनोज जरांगे हे मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत उपोषण सोडणार आहेत.
मुख्यमंंत्री शिंदे वाशीकडे रवाना; जरांगे थोड्याच वेळात सोडणार उपोषण
मनोज जरांगे काय म्हणाले?
शिष्टमंडळाच्या बैठकीनंतर बोलताना मनोज जरांगे म्हणाले की, आपला लढा होता तो मराठा समाजाच्या ५४ लाख नोंदी सापडल्या त्यांना प्रमाणपत्र तातडीने द्यावेत तसेत नोंदी सापडल्या त्या परिवारांना सुद्धा तातडीने प्रमाणपत्र वितरीत करण्यात यावीत. ती प्रक्रिया सुरू झाली आहे. ५७ लाखांपैकी ३७ लाख प्रमाणपत्र वाटप करण्यात आले आहेत. याचा डाटा देखील देण्यात येणार आहे.
ज्यांची नोंद सापडली त्यांच्या सगेसोयऱ्यांसाठी अध्यादेश पारित करावा लागेल ही आपली सर्वात मोठी मागणी देखील मान्य करण्यात आली आहे . तसेच मराठा समाजाच्या तिन्ही मोठ्या मागण्या मान्य झाल्याचे देखील मनोज जरांगे यांनी स्पष्ट केलं.
ते म्हणाले की, अध्यादेशावरती तीन तास मुंबई हायकोर्टाच्या २०-२२ जेष्ठ वकिलांनी मिळून प्रत्येक शब्दांची खात्री केली आणि त्यानंतरच आपण बाहेर पडलो. आपल्याला सगेसोयऱ्यांचं त्यामध्ये घ्यायचं होतं ते घेतलं आहे. अंतरवाली येथे दाखल झालेले गुन्हे मागे घेण्यात येतील असेही जरांगे यावेळी म्हणाले. तसेच शिक्षणाबाबत ओबीसींच्या सवलती मराठा बांधवांना देखील देण्यात येतील, येत्या आधिवेशनात याचा कायदा करण्यात येईल.
मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी गेली अनेक महिने निकराचा लढा सुरू ठेवला होता. शासनाने त्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष केल्यामुळे त्यांनी आंतरवाली सराटी येथून मुंबईकडे कूच केली होती. त्यावेळी पासून शासनाकडून योग्य ती कार्यवाही करण्यासंदर्भातील कार्यवाही सुरू करण्यात आली होती.
आज शनिवारी सकाळी मुंबईकडे कूच करणार होते त्यापूर्वीच शासनाकडून मंत्री दीपक केसरकर व मंगल प्रभात लोढा हे जरांगे पाटील यांच्याबरोबर चर्चेसाठी शासनाचे प्रतिनिधी म्हणून दाखल झाले होते. त्यांच्यामध्ये चर्चा होऊन जरांगे पाटील यांनी केलेल्या मागण्या मान्य केल्याचे जरांगे पाटील यांनी पहाटे तीन वाजता झालेल्या पत्रकार परिषदेत जाहीर केले. दरम्यान सकाळी आठ वाजता मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते जरांगे पाटील हे त्या मागण्या संदर्भातील अध्यादेश स्वीकारून उपोषण थांबवणार आहेत.