आज सायंकाळपर्यंत मराठा समाजास ओबीसी मधून आरक्षण न दिल्यास जामखेडमध्ये होणार साखळी उपोषण सुरू.
जामखेड प्रतिनिधी
संघर्ष योद्धा मनोज जरांगे यांनी सरकारला मराठा आरक्षणाची पूर्तता करण्यासाठी 24 ऑक्टोबरची म्हणजे आजची मुदत दिली होती. सरकारला दिलेली मुदत आज संपत आहे. जर सरकारने आरक्षण दिले नाहीतर 25 ऑक्टोबरपासून मनोज जरांगे हे पुन्हा आमरण उपोषण सुरू करणार आहेत. याच अनुशंगाने जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी व ओबीसी मधुन आरक्षण मिळावे या मागणीसाठी जामखेडमध्ये देखील मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने साखळी उपोषण सुरू होणार आहे.
दिनांक 14 ऑक्टोबर 2023 रोजी मराठा योद्धा मनोज जरंगे पाटील यांनी अंतरवाली सपाटी जि .जालना या ठिकाणी सभा घेऊन कोट्यावधी मराठा समाजाच्या साक्षीने शासनास 24 तारखेपर्यंत मराठा समाजास सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्यावे व मराठा समाजाला ओबीसी मधुन आरक्षण द्यावे अशी विनंती केली होती .उद्या 24 तारखेला ही मुदत संपत आहे. 24 तारखेला तारखेला जर मराठा समाजास सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊन मराठा समाजाचा ओबीसीमध्ये समावेश केला नाही तर दिनांक 25 ऑक्टोबर पासून मनोज जरांगे पाटील हे अंतरवली सराटी येथे आमरण उपोषणाला बसणार आहेत. त्यांच्या उपोषणास पाठिंबा म्हणून राज्यात प्रत्येक तालुक्यात साखळी उपोषण केले जाणार आहे. आणि त्याप्रमाणे नियोजन म्हणून जामखेड तालुक्यातील सर्व गावे जामखेड तहसील कार्यालयासमोर दररोज एक गाव याप्रमाणे सकाळी नऊ ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत साखळी उपोषण करणार आहेत.
सदरील उपोषण शांततेच्या मार्गाने व कसलाही हिंसात्मक प्रकार न करता तहसील कार्यालयाची परवानगी घेऊन होणार आहे. यासाठी बुधवार दिनांक 25 ऑक्टोबर रोजी जामखेड शहर, गुरुवार 26 ऑक्टोबर रोजी लेहनेवाडी , शुक्रवार 27 ऑक्टोबर रोजी जांबवाडी, शनिवार 28 ऑक्टोबर रोजी सावरगाव , रविवार 29 ऑक्टोबर रोजी भुतवडा याप्रमाणे आरक्षण मिळेपर्यंत तालुक्यातील गावे नियोजनाप्रमाणे दररोज येऊन जामखेड तहसील कार्यालयासमोर साखळी उपोषण करणार आहेत.
तरी वरील दिलेल्या नियोजनाप्रमाणे जामखेड शहर व दिलेल्या गावातील मराठा बांधव दररोज तहसील कार्यालय या ठिकाणी साखळी उपोषणासाठी उपस्थित राहणार आहेत.अशी माहिती जामखेड तालुका मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने देण्यात आली आहे. तसेच कोणीही सदर कालावधीमध्ये हिंसात्मक प्रकार करू नये, साखळी उपोषण शांततेच्या मार्गाने करावे व कोणत्याही मराठा बांधवांनी आरक्षणासाठी आत्महत्या करू नयेत असेही आवाहन मराठा क्रांती मोर्चा जामखेडच्या वतीने करण्यात आले आहे.