जोपर्यंत मराठा आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत राजकारण्यांना गावबंदी; नगरच्या पाथर्डी तालुक्यात लागला भलामोठा फ्लेक्स

अहमदनगर : मराठा आरक्षणाचा लढा दिवसेंदिवस तीव्र होत चालला आहे मराठा आरक्षण, धनगर आरक्षण तसेच इतर अनेक समाजांचा आरक्षणाचा लढा सुरू आहे. या आरक्षणाच्या लढाईमुळे अनेक राजकीय नेत्यांची चांगलीच कुचंबणा झाली आहे.

अनेक ठिकाणी राजकीय नेत्यांना विविध समाजाच्या रोषाला बळी पडावे लागत आहे. काही ठिकाणी राजकीय नेत्यांसह आमदार, खासदार आणि राजकीय लोकप्रतिनिधी यांना गावबंदी करण्यात आली आहे. अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील मिरी या गावातही आता सकल मराठा समाजाच्या वतीने फ्लेक्स लावून राजकीय नेत्यांना गावबंदी घालण्यात आली आहे.

जोपर्यंत मराठ्यांना आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आजी-माजी आमदार, राजकीय पुढारी यांना गावबंदी असेल असं पाथर्डी गावाच्या लोकांनी जाहीर केलं आहे. सरसकट मराठ्यांना ओबीसीतून, 50 टक्क्यांच्या निकषाच्या आत बसवून आरक्षण द्यावे अशा आशयाचा भला मोठा फ्लेक्स गावात लावण्यात आला आहे. यामुळे आता राजकीय नेत्यांना गावात जाणे मुश्किल होणार आहे. दरम्यान याबाबत ग्रामपंचायतमध्ये कोणताही ठराव झाला नसून हा निर्णय सकल मराठा समाजाच्या युवकांनी घेतला असल्याची माहिती देण्यात आली आहे.

शब्द बदलला तर गाठ मराठ्यांशी

दरम्यान, सरकारनं आमच्याकडून 40 दिवसांचा वेळ घेतला आहे, तुम्ही शब्द बदला, मग 40 व्या दिवसानंतर गाठ मराठ्यांशी असल्याचा इशारा मराठा आंदोलन मनोज जरांगे पाटील यांनी दिला. मनोज जरांगे यांनी बोलताना म्हणाले की, पोलिसांना मारले म्हणून आमच्यावर आरोप केला. आम्ही शांततेत बसलो होतो, लहान लहान मुलं असणाऱ्या महिला तिथं आंदोलनात बसल्या होत्या. अशा आंदोलकांवर पोलिसांनी हल्ला केला. हा डाव सरकारनं आखला होता. हा जर डाव सरकारनं आखला नसता तर एक तरी पोलिस बडतर्फ केला असता, पण आत्तापर्यंत एकही पोलिस बडतर्फ केला नसल्याचे जरांगे पाटील म्हणाले.

आमचं रक्त सांडलंय, मागे हटणार नाही

मराठा समाज हा राज्यातील सर्वांत मोठा समाज आहे. राज्याचे पालकत्व स्वीकारलेल्या लोकांनी समान न्याय करायला हवा असे जरांगे पाटील म्हणाले. राज्याचे गृहमंत्री माफी मागताना असे म्हणाले की निष्पाप लोकांवर हल्ला झाला. जर निष्पाप लोकांवर हल्ला झाला असेल तर मग त्यानंतर अधिकारी का बडतर्फ झाले नाहीत? असा सवाल जरांगे पाटील यांनी केला. आमच्या सगळ्या मंत्रीमंडळावर विश्वास आहे. कोणावरही रोष नाही. सरकारनं आंदोलन मोडते का बघितले पण आम्ही ते मोडू दिले नाही. आमचं रक्त सांडलं आहे, आता आम्ही मागे हटणार नाहीत असे जरांगे पाटील म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here