डोळे येणे म्हणजे काय? हा आजार कसा होतो? त्याची लक्षणं काय?
‘डोळे येणे, हा आजार काय आहे? त्यापासून कसा बचाव केला जाऊ शकतो?
सध्या राज्यभरात डोळ्यांची साथ पसरल्याचं पाहायला मिळत आहे. प्रशासनाकडून याबाबत खबरदारी बाळगण्याचंही आवाहन करण्यात येत आहे. सर्दी खोकल्याच्या रुग्णांसोबतच सध्या डोळे येण्याच्या रुग्णांची प्रकरणं वाढताना दिसत आहेत. सध्या लहान-मोठे सर्वांमध्ये ही डोळ्यांची साथ पसरली आहे. अशा वेळी आपण आपली काळजी कशी घ्यावी. यापासून स्वतःच संरक्षण कसं करावं हे सविस्तर जाणून घ्या.
डोळे येणे म्हणजे काय?
खरं तर हा आजार एक प्रकारचं संसर्ग किंवा अॅलर्जी आहे. ज्या व्हायरसमुळे सहसा आपल्याला सर्दी होते, त्या व्हायरसमुळे हा आजार संभवतो. बॅक्टेरियल किंवा व्हायरसमुळे डोळे आलेले असल्यास एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीमध्ये पसरू शकतो, तर ॲलर्जीमुळे डोळे आलेले असल्यास त्याचा दुसऱ्यांना संसर्ग होत नाही.
डोळे येण्याची साथ मोठया प्रमाणात का पसरते?
खरं तर पावसाळ्यात आर्द्रता मोठ्या प्रमाणात वाढते. यामुळे व्हायरस पसरण्याची संधी मिळते. ओलाव्यामुळे संसर्ग बराच काळ शरीरात राहतो. आपल्याला वारंवार घाम येतो आणि यामुळे आपण आपला चेहरा पुसत राहतो. चेहरा पुसताना आपण डोळ्यांनाही हात लावत राहतो. या सर्व कारणांमुळे संसर्ग होतो आणि डोळे येण्याची साथ पसरते.
डोळे येण्याची लक्षणं काय आहेत?
डोळे आले असल्यास काही लक्षणं प्रामुख्याने जाणवू लागतात. डोळे हलके लाल होऊ लागतात. डोळ्यातून पाणी यायला लागतं.
खाज येऊ लागते. डोळ्यात थोडी चिकटपणा येतो. डोळ्यात वारंवार खाज येते. तज्ज्ञ सांगतात की, कधीकधी यासोबत सर्दी, खोकला, ताप अशी लक्षणेही जाणवू शकतात.
‘डोळे येणे’ हा आजार काय आहे? त्यापासून कसा बचाव केला जाऊ शकतो?
“साधारणपणे असं दिसतं की, डोळे येण्याची लक्षणं एका डोळ्यात आधी दिसू लागतात. मग ती दुसऱ्या डोळ्यामध्येही प्रकट होतात. या जिवाणूचा शरीरातला इंक्यूबेशन पिरियेड म्हणजे, संसर्ग होणे ते लक्षणं दिसण्याचा काळ हा तीन-चार दिवसांचा आहे. पावसाळ्यात व्हायरसच्या वाढीसाठी आणि पसरण्यासाठी पोषक वातावरण असतं. यामुळे पावसाळ्यात या आजाराची साथ जास्त पसरताना दिसते,”अशी माहिती पुण्यातले ज्येष्ठ नेत्ररोगतज्ज्ञ डॉ. संजय पाटील यांनी दिली.
संसर्ग झाल्यास कोणते उपचार असतात?
डोळे आल्यास साधारणपणे दोन आठवड्यांच्या कालावधीत हा आजार बरा होतो. डॉक्टर सांगतात की, हा आजार बरा करण्यासाठी शरिराच्या रोगप्रतिकारक शक्तीला पुरक अशीच औषधं दिली जातात. डॉक्टर डोळ्यात टाकण्यासाठी काही ड्रॅप देतात. तसंच जर ताप किंवा तत्सम काही लक्षणं असतील तर त्यावरही काही औषधं दिली जाऊ शकतात.
डॉ. संजय पाटील सांगतात की, या औषधांचा वापर डॉक्टरांच्याच सल्ल्याने आणि त्यांनी सांगितलेल्या प्रमाणातच करणं आवश्यक आहे.
‘डोळे येणे’ हा आजार काय आहे? त्यापासून कसा बचाव केला जाऊ शकतो?
ज्यांना संसर्ग झाला आहे त्यांना प्रकाशाचा त्रास होऊ शकतो. त्यामुळे त्यांनी गॉगल वापरावे, तसंच हात स्वच्छ धुवत राहावेत जेणेकरुन डोळ्यातून आलेला स्त्रावाला हात लागल्याने इतरांना संसर्ग होणार नाही. कॉन्टॅक्ट लेन्स वापरणे टाळा. घरात स्वच्छ टॉवेल, रुमाल वापरा. हा आजार फार गंभीर स्वरुपाचा गणला जात नसला तरीही त्याकडे दुर्लक्ष करु नये, असं डॉक्टर सांगतात.
“डोळे आल्यावर हा आजार काही दिवसांनी आपोआप बरा होतो. पण काही मोजक्या केसेसमध्ये संसर्ग वाढण्याची शक्यता असते आणि तो संसर्ग बुबुळांमध्ये जाऊ शकतो. तेव्हा बुबुळांवर पांढरे ठिपके दिसू लागतात असा परिस्थितीमध्ये आजाराचा गंभीरपणा वाढतो.
औषधांनी आणि योग्य काळजी घेऊन बुबुळातील संसर्गही दूर होतो. पण त्यासाठी वेळ लागतो. त्यामुळे डोळे येण्याची लक्षणं जाणवायला सुरुवात झाल्या झाल्या योग्य औषधोपचार आणि काळजी घेणं गरजेचं आहे,” असं डॉ. संजय पाटील यांनी सांगितलं.
संसर्ग होऊ नये यासाठी कोणती काळजी घ्यावी?
डॉक्टर सांगतात की, कोणताही संसर्ग जन्य आजारापासून बचाव करण्यासाठी जी काळजी घेणं गरजेचं असतं, ती घेतल्याने या आजारापासून बचाव केला जाऊ शकतो. संसर्ग झालेल्या व्यक्तीने वापरलेले रुमाल, टावेल वापरणं टाळावं हात स्वच्छ धुवावेत डोळ्यांना सारखा हात लावू नये.