

आदिवासी समाजाला मुख्य प्रवाहात आणणे काळाची गरज – नामदेव भोसले (साहित्यिक)
जनविकास सेवाभावी संस्थेच्या संपर्क कार्यालयाचा उद्घाटन समारंभ संपन्न
जामखेड प्रतिनिधी:जामखेड तालुक्यात आदिवासी पारधी समाजातील सामाजिक कार्यकर्त्या लक्ष्मीताई पवार यांनी आदिवासी, भटके विमुक्त, गोरगरीब जनतेचे तसेच सर्व सामान्य समाजाचे प्रश्न सोडविण्यासाठी मानवी हक्क अभियानाचे प्रदेश सचिव कडूदास कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली व साहित्यिक तथा महाराष्ट्र शासन आदिवासी समाज सेवक पुरस्कार प्राप्त नामदेव भोसले यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. भगवान मुरूमकर, राजेंद्र काळे, सावकार भोसले, कॅप्टन लक्ष्मण भोरे, गुलाब जांभळे, उमेश (काका) देशमुख, विनायक राऊत, बापुसाहेब गायकवाड, अमित गंभीर, प्रा. विकी घायतडक, राम पवार, संदिप गायकवाड, गफ्फारभाई पठाण, दत्तात्रय काळे, कदम साहेब, उपेंद्र आढाव, अशोक पवार, अंतुश काळे, रेखा पवार, मिरा तंटक, रूक्साणा पठाण, जया हातळगे, उज्ज्वला ताई, जयमाला काळे, सुदा भोसले आदी मान्यवर उपस्थित होते.

नामदेव भोसले यांनी बोलताना सांगितले की, आदिवासी समाजाला रूढी परंपरा व अंधश्रद्धेने गुंतवून ठेवले असून या सगळ्यातून समाजाला बाहेर काढायचं असेल तर या समाजाला मुख्य प्रवाहात आणणे काळाची गरज असल्याचे सांगितले. आज जनविकास सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून जामखेड तालुक्यातील सर्व समाजाला सोबत घेऊन सामाजिक कामाची चळवळ लक्ष्मी पवार यांनी सुरू केली त्याबद्दल त्यांचे अभिनंदन. परंतु हे काम पुढे घेऊन जाण्यासाठी तुम्हा आम्हाला त्यांच्या अडी अडचणींच्या काळात साथ देण्याची गरज असल्याचे सांगितले. आदिवासी समाजात व्यसनाधीनता मोठ्या प्रमाणात असून व्यसनमुक्ती करण्यास प्रयत्न करणे आवश्यक आहे असे मत व्यक्त केले.

कार्यक्रमाचे अध्यक्ष कडूदास कांबळे यांनी बोलताना सांगितले की, आदिवासी समाजातील अडीअडचणी समाजातील कार्यकर्ताच चांगल्या प्रकारे सोडवू शकतो, समाजातील अनिष्ट रूढी परंपरा, जात पंचायत, अंधश्रद्धा, व्यसनाधीनता, पोलिस प्रशासनाची भिती, या सर्व गोष्टी सोडवण्यासाठी व समाजाची जाणीव जागृती करण्यासाठी समाजाच्या कार्यकर्त्यांना साथ देण्याची गरज असल्याचे मत व्यक्त करत जनविकास सेवाभावी संस्थेच्या सामाजिक उपक्रमांना माझ्या वतीने अधिकाधिक मदत करण्याचे आश्वासन दिले.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संतोष पिंपळे, हर्षद काळे, संदिप घायतडक, शिवहरी काळे, करण काळे, भिमा काळे, जालिंदर काळे आदींनी सहकार्य केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक संतोष गर्जे यांनी केले तर उपस्थित सर्व मान्यवरांचे आभार संस्थेच्या अध्यक्षा लक्ष्मी पवार यांनी मानले.






