आता तालुक्याच्या ठिकाणी जाण्याची चिंता मिटली, ‘शासन आपल्या दारी’ येणार, महसूल विभाग गावातच दाखले देणार

अहमदनगर : सरकारी दाखले मिळण्यासाठी नागरिकांचे हेलपाटे वाचावेत आणि हे दाखल त्यांना गावातच उपलब्ध व्हावेत, यासाठी महसूल विभागातर्फे शासन आपल्या दारी ही मोहीम राबविण्यात येणार आहे. यामध्ये सरकारी अधिकारी गावागावात शिबिरे घेऊन दाखल्यांचे वाटप करणार आहेत, अशी माहिती महसूलमंत्री तथा नगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली.

या शिबिराच्यावेळी भाजपच्या कार्यकर्त्यांनीही लोकांना मदत करावी, अशा सूचनाही विखे पाटील यांनी दिल्या आहेत. येत्या पंधरा दिवसांत अहमदनगर जिल्ह्यातील सर्व तालुक्यांत ही मोहीम राबविण्याच्या सूचना विखे पाटील यांनी दिल्या आहेत. सरकारी कार्यालयांमधून आवश्‍यक असलेल्‍या सर्व योजनांसाठीचे कागदपत्र, दाखले नागरीकांना सहज सोप्‍या पध्‍दतीने उप‍लब्‍ध व्‍हावेत म्‍हणून सर्व तालुक्‍यांमध्‍ये शासन आपल्‍या दारी हा उपक्रम सुरु करण्‍यात येणार आहे.

या माध्‍यमातून जनतेच्‍या समस्‍याही जाणून घेण्‍याच्‍या सुचना महसूल विभागातील आधिका-यांना दिल्‍या आहेत. महसूल विभागातून आवश्‍यक असलेले दाखले मिळण्‍यास बहुतांशी वेळा विलंब होतो. योजनेचा लाभ घेण्‍यासाठी आवश्‍यक असलेल्‍या कागपत्रांमध्‍ये त्रृटीही असतात. त्‍यामुळे सामान्‍य माणसाला योजनेच्‍या लाभापासून वंचित राहावे लागते.

शाळा, महाविद्यालयांच्‍या कामकाजासाठी आवश्‍यक असलेल्‍या दाखल्‍यांकरीताही विद्यार्थ्‍यांना निर्माण होणाऱ्या अडचणी प्रवेशापूर्वी दूर व्‍हाव्‍यात, शिधापत्रिका, संजय गांधी निराधार योजना, प्रधानमंत्री आवास योजनेसाठी आवश्‍यक असलेले कागदपत्र नागरीकांना सहज उपलब्‍ध व्‍हावेत हा या मागील उद्देश आहे, असं राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले.

अहमदनगर जिल्‍ह्यातील सर्व तालुक्‍यांमध्‍ये तहसिल कार्यालयाच्या वतीने गावपातळीवर शासन आपल्‍या दारी या उप‍क्रमाचे नियोजन करावे. त्‍या त्‍या गावांमध्‍ये या उपक्रमाचे शिबीर आयोजित करण्यापूर्वी नागरीकांना माहिती कळवावी, तसेच म‍हसूल विभागातील सर्व योजनांचे स्‍वतंत्र विभाग करुन, नागरीकांचे अर्ज दाखल करुन त्‍यांच्‍या समस्‍या जाणून घ्‍याव्‍यात अशा सूचना आधिका-यांना देण्यात आल्या आहेत, अशी माहिती विखे पाटील यांनी दिली.

या महिन्‍यातच सर्व ठिकाणी शासन आपल्‍या दारी उपक्रमाचे नियोजन करुन पुढील १५ दिवसात हे सर्व दाखले नागरीकांना कसे मिळतील याचे प्रयत्‍न आधिकाऱ्यांनी करावे. तालुका स्‍तरावर आयोजित केल्‍या जाणार्‍या शासन आपल्‍या दारी या उपक्रमात भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्‍यांनीही सहभाग घेवून नागरीकांच्‍या समस्‍या सोडविण्‍यासाठी यामध्‍ये पुढाकार घ्‍यावा, असे आवाहन विखे पाटील यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here