राज्यपालांना महाराष्ट्राबाहेर पाठवा अन्यथा महाराष्ट्र बंद होईल : संभाजीराजे छत्रपती यांचा सूचक इशारा

पुणे : छत्रपती शिवाजी महाराजांच्या अवमानप्रकरणी संभाजीराजे छत्रपती यांनी पुन्हा एकदा सूचक इशारा दिला आहे. जर राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना महाराष्ट्राच्या बाहेर पाठवण्यात आले नाही, तर संपूर्ण महाराष्ट्र बंद होईल, असे संभाजीराजे छत्रपती यांनी म्हटले आहे. सर्वांनी एकत्र येऊन आपला आवाज दिल्लीपर्यंत पोहचविण्याची गरज असल्याचेही संभाजीराजे छत्रपती यांनी म्हटले आहे.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी एका वेळा नाही, तर दोन वेळा छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला आहे. बारा बलुतेदार आणि बहुजन समाजाला पुढे घेऊन जाणारा हा महाराष्ट्र आहे. सरकारकडून राज्यपालांना हटवले जाणार असे म्हटले जात होते. मात्र, अद्यापही त्यावर कोणातही निर्णय घेण्यात आलेला नाही. त्यामुळे आता अँक्शन घेण्याची वेळ आली आहे. राज्यपालांना राज्याच्या बाहेर पाठवा नाहीतर महाराष्ट्र बंद होइल, असा इशारा संभाजीराजे छत्रपती यांनी दिला आहे.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या बेताल वक्तव्याचा निषेध करत राज्यपालांना राज्याच्या बाहेर हटवावे यासाठी काल पिंपरी-चिंचवड शहर बंदचे आवाहन करण्यात आले होते. त्याला पाठिंबा देण्यासाठी संभाजीराजे छत्रपती पिंपरी येथे आले होते. त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

यावेळी संभाजीराजे म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्या राज्यपाल भगतसिंह कोश्यारींबाबत आपण फक्त चर्चा करत बसलो आहोत. त्यामुळे आपण सर्वांनी एकत्र येण्याची गरज असून आपला आवाज दिल्लीपर्यंत पोहचवण्याची गरज आहे. राज्यपालांची अशी बोलण्याची हिम्मत होतेच कशी, एवढे असूनही सत्ताधारी त्यांना सपोर्ट करतात, हीच मोठी शोकांतिका आहे.

काही जण बोलतात आम्ही निरोप पोहचवला. पण हे सांगा की काय निरोप पोहचवला? कोश्यारी यांची हकालपट्टी करा असा निरोप पोहचवला का? असे जाहीरपणे सांगा, असा टोलाही देवेंद्र फडणवीस यांना लगावला आहे. पिंपरी चिंचवड शहर ही उद्योगांची नगरी असून बंदची सुरुवात याच शहरातून झाली आहे. त्यामुळे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना लवकरात लवकर राज्याबाहेर पाठवा अशी मागणी संभाजीराजे यांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here