

मोठी बातमी! शिर्डी साई संस्थानचा कारभार आता डॅशिंग अधिकारी तुकाराम मुंढे पाहणार, १६ वर्षांत २० पेक्षा जास्त वेळा बदली?
अहमदनगर (प्रतिनिधी) आपल्या डॅशिंग पद्धतीने काम करण्याच्या शैलीसाठी प्रसिद्ध असलेले आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांची शिर्डीच्या साईबाबा संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

याअगोदर दोन महिन्यापूर्वीच सप्टेंबर अखेरीस मुंढे यांच्यावर आरोग्य विभागाच्या आयुक्तपदाची जबाबदारी सोपवण्यात आली होती. डॉ. रामस्वामी एन. यांच्याकडून मुंढे यांनी पदभार स्वीकारला होता. त्यानंतर आता साईबाबा संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी असलेल्या भाग्यश्री बानायत यांच्या जागी तुकाराम मुंढे यांनी पदभार स्वीकारला आहे.

दरम्यान, भाग्यश्री बानायत यांची नागपूरच्या विदर्भ वैधानिक विकास महामंडळामध्ये सदस्य सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तुकाराम मुंढे यांच्याकडे राज्यात शिंदे-फडणवीस सरकार आल्यानंतर कुटुंब कल्याण तथा संचालक, राष्ट्रीय आरोग्य अभियान, मुंबईच्या आयुक्तपदाची जबाबदारी देण्यात आली होती. मात्र, दोन महिन्यातच मुंढे यांची बदली करण्यात आली असून त्यांच्यासह इतर सहा आयएएस अधिकाऱ्यांच्याही बदल्या करण्यात आल्या आहेत.

तुकाराम मुंढे यांची नियुक्ती शिर्डी येथे झाल्याने अनेकांनी आनंद व्यक्त केलाय. त्याचबरोबर त्यांच्या धडाकेबाज अंदाजात शासन चालण्याच्या पद्धतीमुळे अनेकांचे धाबे दणाणले आहे. प्रशासनाची शिस्त असो किंवा इतर समस्या अशा अनेक कारणामुळे तुकाराम मुंढे यांची डॅशिंग अधिकारी म्हणून तुलना केली जाते. त्यांनी आरोग्य विभागाची जबाबदारी असताना त्यांनी अनेक ठिकाणी अचानक भेटी देऊन तेथील गैरसोईंबाबत बेजबाबदार अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना खडेबोल सुनावले होते.

मुंढे यांच्या कार्यशैलीमुळे सुरुवाती पासूनच डॉक्टर कर्मचाऱ्यांच्या संघटनांचा विरोध असल्याचं दिसत होतं. दरम्यान, डॉक्टर कर्मचाऱ्यांच्या संघटनांनी आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्याकडे मुंढे यांची तक्रारी केल्याची माहितीही समोर आली होती. त्यातच आता त्यांची बदली ही होणे चर्चेचा विषय बनला आहे.

१६ वर्षांत २० पेक्षा जास्त वेळा बदली?
गेल्या १६ वर्षांच्या सेवेत तुकाराम मुंढे यांची २० पेक्षा जास्त वेळा बदली झाली आहे. तुकाराम मुंढे हे २००५ सालच्या आयएसएस बॅचचे अधिकारी आहेत. तुकाराम मुंढे यांची धडाकेबाज प्रशासकीय अधिकारी अशी ओळख आहे. आता त्यांची राष्ट्रीय आरोग्य अभियान, मुंबईच्या आयुक्तपदाच्या जबाबदारीवरून साईबाबा संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे.






