

मराठा वधु -वर पालक मेळावा ही काळाची गरज- प्रा.मधुकर राळेभात
जामखेड येथे ६४ वा मोफत मराठा वधु -वर मेळावा संपन्न.
जामखेड (प्रतिनिधी) मराठा वधु -वर पालक मेळावा ही काळाची गरज बनली आहे. ग्रामिण भागातील मुलांना कोणी मुलगी देत नाही. त्यामुळे त्यांच्या विवाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामळे मुलींच्या पालकांनी शेतकरी, व्यवसायिक मुलांना देखील मुली द्याव्यात. घटस्फोटित, विधवा मुलींना त्यांच्या पाल्यासह स्विकारावे असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे कर्जत-जामखेड विधानसभा अध्यक्ष प्रा.मधुकर राळेभात यांनी केले.

मराठी सोयरिक संस्था, अहमदनगर व सकल मराठा समाजाच्या वतीने मराठा समाजातील विवाह इच्छुकांसाठी वधु-वर परिचय मेळाव्याचे आयोजन जामखेड येथील केशर हाॅल येथे करण्यात आले होते.याप्रसंगी स्वाभिमानी पक्षाचे अध्यक्ष मंगेश आजबे, ,पंचायत समितीचे सभापति सुर्यकांत मोरे, कांग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष शहाजी राजे भोसले, मराठी सोयरीकचे संस्थापक अशोक कुटे,जिल्हा प्राथमिक शिक्षक परिषदेचे कार्याध्यक्ष व मराठा सेवा संघाचे तालुकाध्यक्ष राम निकम ,युवक काँग्रेसचे राज्याचे सचिव राहुल उगले, संभाजी ब्रिगेडचे जिल्हा कार्याध्यक्ष अवधूत पवार,शिवव्याख्याते गणेश भोसले, अशोक पठाडे, दादासाहेब वारे, डॉ संजय भोरे, किसन वराट,पत्रकार सुदाम वराट आदि मान्यवर उपस्थित होते.

यावेळी शहाजी राजे भोसले यांनी मुलींच्या पालकांच्या दिवसेंदिवस वाढत असलेल्या अपेक्षा बाबत नाराजी व्यक्त केली. शेतकरी मुलांना मुली मिळत नाही या गंभीर समस्येकडं लक्ष देण्यासाठी समाजाने एकत्र येण्याची गरज आहे असे मत मंगेश आजबे यांनी व्यक्त केले. शेतकरी मुलांनी आपले राहणीमान बदलावे, लग्न जमवताना पालकांनी अनिष्ट रूढी परंपरा सोडून वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवावा अशा काही सूचना संस्थेचे संचालक अशोक कुटे यांनी सांगितल्या.

यावेळी अहमदनगर, सोलापूर, पुणे, नाशिक,बीड, उस्मानाबाद जिल्ह्यातून आलेल्या ९७ वधु-वरांनी, पालकांनी आपला परिचय दिला.मेळाव्याचे प्रास्ताविक प्रा.राम निकम यांनी तर प्रभावी असे सूत्रसंचालन केशव कोल्हे व संतोष भोंडवें यांनी केले. आभार संभाजी ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष कुंडल राळेभात यानी मानले.कार्यक्रमास समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.






