
भगवान टोळीचा मी पण खुप जुना शिकारी – संदीप (दादा) शिंदे
जामखेड प्रतिनिधी
डॉ भागवान मुरुमकर व त्यांच्या टोळीने खांडणीसाठी अंदुरे कुटूंबावर जो हल्ला केला आहे तीच वेळ मी २०१२ पासुन भोगत आहे. मी पण भगवान टोळीचा खुप जुना शिकारी आहे. त्यामुळे जामखेड तालुक्यातील जनतेला विनंती करतो की या भगवान टोळीचे जे शिकारी झाले आहेत त्यांनी त्यांनी न घाबरता समोर येऊन आपल्या अन्यायाला वाचा फोडावी व अंदुरे कुटुंबीयांना साथ द्यावी आसे मत जामखेड येथिल अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे सदस्य संदीप (दादा) शिंदे यांनी नुकत्याच घेतलेल्या पत्रकार परिषदेत केले आहे.

काही दिवसांपूर्वी पंचायत समितीचे माजी सभापती डॉ. भगवान मुरूमकर यांच्या सह आठ जणांविरोधात व्यापारी अंदुरे यांनी खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे. यानंतर सावळेश्वर उद्योग समूहाचे रमेश आजबे यांनी देखील पत्रकार परिषद घेत भगवान मुरूमकर यांच्या टोळीच्या त्रासाचा उल्लेख केला होता. हे वातावरण शांत होत नाही तोच पुन्हा नुकतीच जामखेड येथिल रमेश खाडे नगर भागात रहाणारे रहिवाशी संदीप (दादा) शिंदे यांनी पत्रकार परिषद घेत या टोळीचा मी देखील जुना शिकारी आहे आसे सांगितले. त्यामुळे संदीप शिंदे यांच्या नंतर आता पुढे कोणता शिकार झालेला व्यक्ती समोर येणार का? पहावे लागणार आहे.


संदीप (दादा) शिंदे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, २०१२ साली डॉ. भगवान मुरूमकर यांचे सहकारी त्यांच्या २००० नंबरच्या टाटा सफारी गाडीतून माझ्या कडे येत मला गाडीत टाकून पंचायत समिती मध्ये घेऊन जात असत व खंडणीची मागणी करत असत. यावेळी डॉ.भगवान मुरूमकर मला म्हणत असत तु दहा लाख रुपये दिल्याशिवाय सुट्टी नाही तु जर पैसे दिले नाहीस तर तुला तुझ्या जागेत पाय ठेऊ देणार नाही. तसेच ज्या ज्या ठिकाणी तुझ्या जागा आहेत त्या सर्व जागांमध्ये तुला पाय ठेऊ देणार नाहीत, असे भगवान मुरूमकर व त्याचे साथीदार यांनी मला वारंवार खंडणीसाठी त्रास द्यायचे.

त्याच वेळी मी माझा आवाज उठवला असता तर आज सांगर अंदुरे यांच्या कुटुंबावरती जो अन्याय झालेला आहे तो झाला नसता. तसेच अंदुरे कुटुंबीयांना मारहाण होऊनही चार दिवस आरोपी दुकानापुढे येऊन दिवस दिवस बसत होते त्यावेळी पोलीस काय करत होते असा सवालही उपस्थित केला.
भगवान टोळीचा अंदुरे कुटूंबाला जो त्रास झाला आहे तशी वेळ कोणावरही येऊ नये त्यामुळे शहरातील ज्यांना या टोळीचा त्रास झालेला आहे त्यांनी पुढे यावे व अंदुरे कुटुंबीयांना साथ द्यावी असे आवाहन संदीप (दादा) शिंदे यांनी जामखेड येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत केले आहे.






