
गुजरात पूल दुर्घटनेत मृतांचा आकडा वाढला; अत्तापर्यंन्त 132 जणांचा झाला मुत्यू, महिला, मुलाबाळांचा करुण अंत
गुजरातमधील मोरबी इथे मच्छू नदीवरील झुलता पूल कोसळल्यामुळे 132 जणांचा बळी गेला. रविवारी संध्याकाळी साडेसहा वाजता हा पूल कोसळला. ज्यानंतर तातडीनं बचावकार्य हाती घेत नदीतून मृतदेह बाहेर काढण्याचं काम सुरू करण्यात आलं.

आत्तापर्यंत 137 जणांचे मृतदेह नदीतून बाहेर काढले गेले आहेत. सुरुवातीला या दुर्घटनेमध्ये 90 हून अधिकजणांचा मृत्यू ओढावल्याची माहिती समोर आली होती. ज्यानंतर आता हा आकडा 132 वर पोहोचल्याचं कळत आहे.

सदर दुर्घटनेमध्ये मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती आहे. आताच्या घडीला 2 जण बेपत्ता असल्याचं सांगण्यात येत असून, बचाव कार्य शेवटच्या टप्प्यात असल्याचं सांगण्यात येत आहे. या घटनेनंतर पूल ऑपरेटर अंजता अरेव्हा या कंपनीवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा पूल चार दिवसांपूर्वीच दुरूस्तीनंतर खुला करण्यात आला होता. पूल कोसळला तेव्हा त्या पुलावर मोठ्या प्रमाणात महिला आणि मुलं होती. पूल कोसळण्याआधी अनेकजण या पुलावर नाचत होते, उड्या मारत होते, तसंच काही जण पुलाच्या मोठमोठ्या वायर्स खेचत होते असं एका प्रत्यक्षदर्शीने सांगितलं.

पुलावर मोठी गर्दी झाल्यामुळे पूल कोसळला असावा असा अंदाज व्यक्त केला जातोय. दरम्यान, गुजरात सरकारने प्रकरणाची चौकशी करण्यासाठी पाच सदस्यीय समिती स्थापन केली आहे.
काय आहे मोरबी पुलाचा इतिहास?
या पुलाचे उद्घाटन 20 फेब्रुवारी 1879 रोजी मुंबईचे तत्कालिन गव्हर्नर रिचर्ड टेंपल यांच्या हस्ते झाले होते. 1880 मध्ये सुमारे 3.5 लाख खर्चून पूल बांधला होता. त्यावेळी पूल बांधण्याचे साहित्य इंग्लंडमधून आले होते. दरबारगड आणि नजरबागला जोडण्यासाठी हा पूल बांधण्यात आला होता. मोरबीचा हा केबल पूल 140 वर्षांहून जुना असून त्याची लांबी सुमारे 765 फूट आहे. हा केबल ब्रिज केवळ गुजरातच्या मोरबीचाच नाही तर संपूर्ण देशाचा ऐतिहासिक वारसा आहे.







