विजेचा धक्का लागून चार मुलांच्या मृत्यूप्रकरणी वीज विभागाचे सहाय्यक अभियंता आणि वायरमन यांचे निलंबन; राधाकृष्ण विखे पाटील यांचे आदेश

अहमदनगर : संगमनेर तालुक्यातील खंदरमाळ परिसरातील तलावात पोहायला गेलेल्या चार मुलांचा वीजेचा शॉक लागून मृत्यू झाल्याची घटना घडली होती. या प्रकरणी घारगाव विभागाचे सहाय्यक अभियंता आणि वायरमन यांच्या निलंबनाचे आदेश जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले आहेत. 

संगमनेर तालुक्यातील खंदरमाळ परिसरात चार दिवसांपूर्वी वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. यावेळी परिसरातून गेलेल्या विद्युत वाहिनीची तार तुटून वीज प्रवाह सुरू राहिल्याने तलावात अंघोळीसाठी गेलेल्या चार मुलांना शॉक लागून त्यांचा दुर्देवी मृत्यू झाल्याची घटना काल शनिवारी घडली. यानंतर वीजवितरण कार्यालयाच्या निष्काळजीपणामुळे हे मृत्यू झाल्याचा आरोप करत पालकांसह नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेण्यास नकार देत आक्रमक पवित्रा घेतला. आज सकाळी मृत मुलांच्या कुटुंबियांची पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी भेट घेतली. वीज वितरणच्या निष्काळजीपणामुळे चौघांचा झाला मृत्यू झाला असून घारगाव विभागाचे सहाय्यक अभियंता आणि वायरमन यांच्या निलंबनाचे आदेश दिल्यानंतर चारही मुलांवर अंत्यसंस्कार करण्यात आले.

मुख्यमंत्री सहाय्यता निधी, वीज वितरण सानुग्रह अनुदान आणि स्वर्गीय गोपीनाथ मुंडे सहाय्यता योजनेतून मृत मुलांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 11 लाख रुपयांची आर्थिक मदत देणार असल्याची‌ घोषणा विखे पाटील यांनी केली आहे. जिल्ह्यातील सर्व वीज वाहक तारा आणि पोलचा सर्व्हे करून दुरुस्तीच्या सूचना देखील विखे पाटील यांनी दिल्या आहेत.

 

निवडणूक आयोगाने धनुष्यबाण हे चिन्ह गोठवलं आहे, याबाबत बोलताना विखे पाटील यांनी ठाकरे गटावर निशाणा साधलाय‌. ते म्हणाले की, “सतत केंद्रावर आरोप करण्यापलीकडे त्यांच्याकडे काय शिल्लक राहिलंय? जनाधार आणि सरकार गमावल्यानंतर त्यांना स्वतः आत्मपरीक्षण करण्याची त्यांना गरज आहे. चुकीचे सल्लागार आणि बेताल वक्तव्य करणारे प्रवक्ते यामुळे सेनेवर ही वेळ आलीय.” सत्याचा विजय नेहमी होतो, एकनाथ शिंदे यांचा हा मोठा विजय असल्याचं विखे पाटील म्हणाले.

त्या वक्तव्या प्रकरणी उद्धवजींनी शिंदे कुटुंबीयांची माफी मागावी

पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की, “सार्वजनिक जीवनात व्यक्तीगत पातळीवर टीका करणे थांबले पाहिजे. सुजयच्या निवडणुकीत सुद्धा एका ज्येष्ठ नेत्याने कुटुंबा-कुटुंबात शिवराळ भाषेत टीका करण्याची सवय लावली आणि तेच आता त्यांचे सल्लागार असल्यानं ते वेगळं काय सांगणार? उद्धवजीकडून अशी अपेक्षा नव्हती. त्यांनी शिंदे कुटुंबीयांची माफी मागावी.”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here