


विजेचा धक्का लागून पोलवरुन खाली पडल्याने तरुणाचा जागीच मृत्यू
जामखेड प्रतिनिधी
नगरपरिषद हद्दीतील बटेवाडी या ठीकाणी लाईटच्या पोलवर एल ए डी बल्ब बसवत आसताना पोलवरुन खाली पडल्याने गंभीर जखमी होऊन तीस वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाला.


अविनाश उर्फ ( बालाजी) मारूती आजबे वय २९ हा नगरपरिषदेच्या स्टेट लाईट ठेकेदाराकडे कामाला होता. नेहमीप्रमाणे आज गुरूवार दि. ६ रोजी दुपारी चार वाजण्याच्या दरम्यान नगरपरिषद हद्दीत बटेवाडी येथे लाईटचे काम करत असताना एलईडी बल्ब बदलत होता. यावेळी विजेचा धक्का बसल्याने पोलवरून खाली पडला यामुळे त्याच्या तोंडाला मार लागून पायाला दुखापत झाली होती. या नंतर बटेवाडी येथील परिसरातील लोकांनी खाजगी वाहनाने ताबडतोब जामखेड येथील खाजगी दवाखान्यात दाखल केले आसता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. मयत बालाजी आजबे यांच्या पाश्चात्य पत्नी, दोन लहान मुले, भाऊ आई वडील असा परीवार आहे. बालाजी आजबे यांच्या अचानक मुत्यु मुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे व हळहळ व्यक्त केली जात आहे.


यावेळी कर्मचारी युनियनचे अध्यक्ष डॉ. अँड. अरूण जाधव, पांडूराजे भोसले, सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी, प्रदिप टाफरे, ऋषिकेश बांबरसे, विजय (टिल्लू ) राळेभात, आकाश डोके, हितेश वीर, शहाजी राळेभात, विकास राळेभात, हरिभाऊ आजबे, पत्रकार अशोक वीर, अनिल बाबर, नितीन मुरूमकर, रामेश्वर नेटके, यांनी ग्रामीण रुग्णालय भेट दिली. नगरपरिषद कर्मचार्यांबाबत या अगोदरही दोन दुर्घटना घडल्या आहेत नगरपरिषद कर्मचारी दत्तात्रय वीर व हुसेन शेख यांनाही लाईटच्या पोलवर काम करत असताना अपंगत्व आले आहे आणि आज नगरपरिषद अंतर्गत ठेकेदाराकडे आसलेल्या कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला त्यामुळे या नगरपरिषद कर्मचार्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.


डॉ. अँड. अरूण जाधव नगरपरिषद कर्मचारी संघटना अध्यक्ष यांनी बोलताना सांगितले की, नगरपरिषदेच्या सर्व कर्मचारी वर्गाचा विमा उतरवला पाहिजे तसेच सर्व कर्मचाऱ्यांना सुरक्षा साहित्य पुरविणे गरजेचे आहे. तसेच मृत कर्मचारी बालाजी आजबे यांच्या कुटुंबाला ताबडतोब शासकीय योजनेतून आर्थिक मदत मिळावी.






