डबल इंजिन आसलेले सरकार रेल्वेसाठी निधी कमी पडू देणार नाही- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे; बीड जिल्ह्याची प्रतीक्षा संपली, नगर-आष्टी रेल्वेचा शुभारंभ

आष्टी प्रतिनिधी

बीड जिल्ह्याच्या स्वप्नपूर्तीचा आजचा दिवस आहे. लोकनेते गोपीनाथ मुंडे यांनी पाहिलेले स्वप्न आज सत्यात उतरत आहे. आज लोकनेते मुंडे असते तर खरा आनंद झाला असता. ते आज नसले तरी त्यांचे अधुरे स्वप्न पूर्ण होत असल्याने मी बीड जिल्ह्यातील जनतेला शुभेच्छा देतो. डबल इंजिन सरकार निधी कमी पडू देणार नाही, असा शब्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला.

नगर-आष्टी रेल्वेच्या शुभारंभ सोहळ्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या कार्यक्रमास ऑनलाईन उपस्थिती लावली होती. यावेळी व्यासपीठावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, रेल्वे राज्य मंत्री रावसाहेब दानवे, महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, भाजप नेत्या पंकजा मुंडे, खा. प्रितम मुंडे, सुजय विखे, आ. सुरेश धस, बाळासाहेब अजबे, आ. नमिता मुंदडा, कर्डिले, माजी आमदार भीमराव धोंडे आदींची उपस्थिती होती.

यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की लोकनेते गोपीनाथ मुंडे यांनी रेल्वेसाठी सर्वात मोठा पुढाकार घेतला होता. यामुळे त्यांचे अधुरे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आम्ही वररूमच्या माध्यमातून सातत्याने आढावा घेत होतो. रेल्वे मार्गातील ज्या अडचणी असतील त्या सोडवत होतो. 2 हजार कोटी निधी आजपर्यंत केंद्र सरकारने दिला. यातील 1800 कोटी मोदी सरकार काळात दिले. राज्याने 1400 कोटी दिले. यातील 1175 कोटी मी माझ्या काळात दिले. केवळ लोकनेते मुंडे साहेब यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने भरघोस निधी दिला. आज अर्धेच स्वप्न पूर्ण झाले. परंतु ही रेल्वे परळी पर्यंत धावेल तेंव्हाच लोकनेता मुंडे यांचे स्वप्न पूर्ण होईल. बीड जिल्ह्यावाशीयांनी काळजी करू नये आता केंद्र आणि राज्य असे डबल इंजिन सरकार आहे. लागेल तेवढा निधी देऊ. कायम दुष्काळी असलेल्या आष्टीत पाणी आणू. मुख्यमंत्री आणि मी कुठेच निधी कमी पडू देणार नाही. मुंडे साहेब यांचे स्वप्न पूर्ण केल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही असा शब्द देतो.

देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर मागास असलेला मराठवाडा, विदर्भ विकासाच्या प्रवाहात आला. लोकनेते गोपीनाथ मुंडे ज्या ज्या वेळी बैठकीत, सभागृहात बोलायचे त्यावेळी बीडच्या रेल्वेचा प्रश्न मांडायचे. 2 जून 2014 ला रात्री 11 पर्यंत त्यांच्यासोबत होतो. रेल्वे हे त्यांचं स्वप्न होतं. बीड रेल्वेला एक पैसा सुद्धा कमी पडू देणार नाही. मार्च 2023 पर्यंत हा मार्ग बीडपर्यंत पूर्ण करणार असल्याचा शब्द देतो. इलेक्ट्रिकवर रेल्वे चालवण्यासाठी मंजूरी मिळाली आहे. लोक विचारायाचे मंत्री पद कोणतं?”एकाच पाण्याने सारी सायकल खोल- फिटिंग करता. यायची तो पाना म्हणजे बारा भोक्षाचा पाना. कोणाचं कोणतं काम अडू देत नाही. माझं काम कोणी अडवत नाहीत. म्हणून मी अभिमानाने बारा भोक्षाचा पाना असल्याचे सांगतो, असे केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे म्हणाले.

नगर आणि बीड जिल्हा रेल्वेच्या माध्यमातून जोडला जात आहे. लोकनेते गोपीनाथ मुंडे यांचे स्वप्न पुर्ण होत आहे. भाजपची सत्ता आल्यामुळे हे शक्य झाले आहे. यासाठी देवेंद्र फडणवीस, पंकजा मुंडे, प्रितम यांनी परिश्रम घेतल्याचे राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले.

बीड जिल्हा एवढा शांत का? कारण त्यांना या व्यासपीठावर ज्यांना बघायचे ते लोकनेते मुंडे साहेब नाहीत. यामुळे सारे शांत शांत आहेत. मी दूर गेलोच कुठे, इथेच रहातो आहे. जरी दूर गेलो असलो तरी तुम्हाला डोळे भरून पहातो आहे. लोकनेते मुंडे यांच्या प्रचाराला आल्यानंतर पंतप्रधान मोदी यांनी रेल्वे आणण्याचे आश्वासन दिले होते. 70 वर्षे ज्या क्षणाची हा जिल्हा वाट पहात आहे, तो क्षण आल्याचा मनस्वी आनंद. मुंडे यांचे रेल्वेला नाव द्यावे अशी लोकांची इच्छा पण मी अशी कोणतीही मागणी करणार नाही, असे पंकजा मुंडे म्हणाल्या.

पाच दशकांपासून ज्या रेल्वेची बीड जिल्हा वाट पहात होता, त्या रेल्वेचे स्वागत करते, पहिल्यांदा खासदार झाल्यानंतर राजकारण कळत नव्हतं. त्यावेळी बीडला रेल्वे आणणार म्हटले होते. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गोपीनाथजी मुंडे का सपना भी तो पूर्ण करणा है! असे म्हणत रेल्वेला भरपूर निधी दिला असे म्हणत मुख्यमंत्री, स्व. विलासराव देशमुख, पियुष गोयल, सुरेश प्रभू, दानवे यांचे आभार प्रितम मुंडे यांनी मानले. मध्यतरी महाविकास आघाडी सरकारने वेळेत निधी दिला नसल्याचेही त्या म्हणाल्या. जालना, लातूर, जळगावला प्रकल्प येत आहे. तिथे काही वैशिष्ट्य असेल आमच्या बीडमध्ये असे काही नसेल पण बीडचा माणूसच वैशिष्ट्यपूर्ण आणि फेमस आहे. खूप प्रेम करणारा प्रेमळ माणूस आहे, असे खा. प्रितम मुंडे म्हणाल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here