जामखेड प्रतिनिधी

जामखेड शहरातील दिव्यांगांसाठी शहरातील मुख्य ठिकाण घरकुलासाठी जागा व मोठय़ा प्रमाणात होत असलेल्या व्यवसाईक गाळे देण्यास प्राधान्य दिले जाईल. एकही दिव्यांग नगरपरिषदेच्या योजनांपासून वंचित रहाणार नाही. असे प्रतिपादन जामखेड नगर परिषदेचे मुख्याधिकारी मिनीनाथ दंडवते यांनी केले.

जामखेड येथिल प्रहार जनशक्ती पक्ष व नगरपरिषद जामखेड यांच्या संयुक्त विद्यमाने प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत हक्काचे घर मिळवून देण्यासाठी मार्गदर्शन व अर्ज भरून घेण्यासाठी लोकमान्य वाचनालयात पार पडलेल्या कार्यक्रमात मुख्याधिकारी मिनीनाथ दंडवते बोलत होते.

यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष मिनीनाथ दंडवते यांचेसह प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुकाध्यक्ष जयसिंग उगले, शहराध्यक्ष नय्युम शेख, माजी नगरसेवक हर्शद शेख, आम आदमी पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष संतोष नवलाखा, तालुकाध्यक्ष बजरंग सरडे, नगर परिषदेचे इंजिनिअर सोनटक्के, भोगे, खर्डा शहराध्यक्ष रतन डोके, भिमराव पाटील, अंकुश राळेभात सर, घरकुल विभागाचे प्रमुख भोगे साहेब, मोरे, क्षीरसागर, शिंदे, शबनम सय्यद, विधाते मॅडम, शेळके मॅडम आदी मान्यवर व दिव्यांग बांधव मोठ्या संख्येने उपस्थिती होते.

यावेळी बोलताना नय्युम शेख म्हणाले की, प्रहार जनशक्ति पक्षाचे अध्यक्ष माजी मंत्री बच्चु कडू यांच्या मार्गदर्शनाखाली काम करत असताना जामखेड शहर व तालुक्यात दिव्यांग बांधवासाठी मोठे काम सुरू आहे. जामखेड शहरात दिव्यांग बांधवासाठी घरकुल बांधण्यासाठी जागेची मोठी अडचण आहे. जामखेड नगरपरिषद हद्दीत असलेल्या आरोळे नगर येथे जागा मिळाली तर त्याठिकाणी १०० घर बांधता येतील तरी नगरपरिषदच्या वतीने जिल्हाधिकारी यांचेकडे मागणी करावी. जामखेड नगरपरिषदे मुख्याधिकारी मिनीनाथ दंडवते यांचेही मोठे सहकार्य दिव्यांग बांधवांना भेटत आहे. मुख्याधिकारी यांचेमुळेच जिल्हात सर्वात प्रथम ही योजना जामखेड येथे राबविण्यात येत आहे.

यावेळी भिमराव पाटील, जयसिंग उगले, अंकुश राळेभात यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी पुढे बोलताना मुख्याधिकारी मिनीनाथ दंडवते म्हणाले की, पंतप्रधान गती देण्यासाठी केंद्र व राज्य शासनाचा मानस आहे. त्याअंतर्गत विविध स्तरांवर बैठकाही झाल्या आहेत. मी मुख्याधिकारी म्हणून पदभार घेण्यापूर्वी जामखेड शहरात फक्त १० घरकुल पुर्ण तर २८ ते ३० घरकुलांची कामे सुरू होती. मात्र मागील दिड पाऊणे दोन वर्षांच्या काळात ५०० घरकुलांची कामे सुरू करण्यात आली असून यापैकी ३०० पुर्ण तर २०० घरकुलांची कामे अंतिम टप्प्यात आहेत. याकामी नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांचेही चांगले सहकार्य मिळत आहे. तसेच लाभार्थ्यांमधेही सकारात्मक मानसिकता निर्माण झाल्याने रखडलेल्या २०० लोकांना आम्ही पक्की घरे मिळाली आहेत. घरकुलांबाबत आम्ही करत असलेल्या चांगल्या प्रयत्नांमुळे जामखेड नगरपरिषदेचा नाशिक विभागात प्रथम तर राज्य पातळीवरील ३२१ मध्ये आपण १० ते १२ क्रमांकवर आहोत.

ज्या दिव्यांगांकडे ५०० स्क्वेअर फुटांपर्यंत स्वतःची जागा आहे, त्यांच्याकडे घरी येऊन नगरपरिषद कर्मचारी त्यांचे अर्ज भरून घेतली. लाभ घेताना दिव्यांगांनी कागदपत्रांची पूर्तता करणे गरजेचे आहे. कारण काही लबाड व बनावट दिव्यांग लाभ घेण्याची शक्यता आहे. कोणत्याही बाबतीत आम्ही अडवणूक न करता जाणीवपूर्वक मार्ग काढण्याचे काम करतो. खा. सुजय विखे, आ. रोहित पवार व आ. प्रा. राम शिंदे या तिन्ही लोकप्रतिनिधींकडे पाठपुरावा करून जामखेड शहरातील मुख्य ठिकाणी दिव्यांगाच्या घरकुलासाठी जागा मिळावी यासाठी आपण सर्व मिळून त्यांच्या घरकुलांचे प्रश्न मार्गी लावून त्यांचे घराचे स्वप्न पुर्ण करू.

तसेच यावेळी प्रहार संघटनेचे दिव्यांगासाठीचे जामखेड शहरात कौतुकास्पद काम आहे. दिव्यांगांनी आपल्याला दुर्लक्ष न समजता व्यवसाय करावेत, व्यसनापासून दुर राहुन आपले आरोग्य चांगले ठेवावे असेही मत मुख्याधिकारी मिनीनाथ दंडवते यांनी व्यक्त केले. या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन जयसिंग उगले, प्रास्ताविक नय्युम शेख यांनी केले.





