जामखेड प्रतिनिधी

शेतकऱ्यांच्या वाहतुकीचा प्रश्न सुटत नसल्याने ७०० ते ८०० लोकांना फटका बसत आहे, तरी खर्डा शहरातील राजकारण करण्याऱ्या नेत्यांचे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र सध्यातरी दिसून येत आहे. लोकप्रतिनिधी म्हणून आमदार रोहित पवार यांनी लक्ष घालून रस्त्याचा प्रश्न सोडवावा अशी मागणी येथील नागरिकांनी केली आहे. परंतु अद्यापही हा प्रश्न सुटला नसल्याने या भागातील शेतकरी हैराण झाले आहेत.

याबाबत माहिती अशी की, खर्डा येथून प्राथमिक आरोग्य केंद्राच्या जवळून जाणारा जुना वाकी रस्ता हा गेली अनेक वर्षापासून दुर्लक्षित झाला आहे येथील पुलाचे पूर्वी केलेले काम सुद्धा नीत्कृष्ट दर्जाचे झाले आहे, पावसाळ्यात या भागातील शेतकऱ्यांना शेतात जाताना मोठी कसरत करावी लागत आहे. दररोज दूध, भाजीपाला व इतर शेतातील पिकवलेले धान्य आणताना मोठी तारांबळ या भागातील शेतकऱ्यांची होत आहे.

इथून मागच्या काळात अनेक राजकीय नेत्यांनी हा रस्ता दुरुस्त करून देऊ असे आश्वासन देऊन मते घेतली परंतु रस्त्याचा प्रश्न मार्गी लावला नाही त्यामुळे या भागात राहणाऱ्या शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच पडली आहे,या संदर्भात लोकप्रतिनिधी म्हणून आमदार रोहित पवार यांनी दिलेल्या आश्वासनानुसार खर्डा ते जुना वाकी रस्त्याचे काम पूर्ण करावे अशी अपेक्षा शेतकऱ्यांना बोलताना व्यक्त केली आहे.






