जामखेड प्रतिनिधी
देहू येथील संत तुकाराम महाराज यांच्या शिळा मंदिराच्या लोकार्पण सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी पुणे जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. मात्र या दौऱ्यात चर्चा झाली ती उपमुख्यमंत्री अजित पवार यांची. पंतप्रधान मोदी व अजित पवार हे एकत्रित जेथे दिसले त्या प्रत्येक घटनेची आज दिवसभर चर्चा होत आहे.

पुण्यातील लोहगाव विमानतळावर नरेंद्र मोदी यांचे स्वागत करण्यासाठी अजित पवार गेले होते. त्यांच्या खांद्यावर मोदींनी हात ठेवला होता. याची चर्चा होत असतानाच देहूतील कार्यक्रमात भाजपचे नेते तथा राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना भाषणाची परवानगी मिळाली. मात्र अजित पवार यांना भाषण करू दिले नाही. या कार्यक्रमात अजित पवार हे राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राज्याचे पालकमंत्री म्हणून उपस्थित होते. मात्र त्यांना या कार्यक्रमात भाषण करू न दिल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसकडून भाजपवर टीके केली जात आहे.

अजित पवार यांना देहूत देण्यात आलेल्या वागणुकीवर कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी ट्विट करत भाजपला टीकेचे लक्ष्य केले आहे. त्यांनी ट्विटद्वारे म्हंटले आहे की, छत्रपतींचा तसेच क्रांतीज्योतींचा अपमान करणाऱ्या राज्यपालांना पंतप्रधान साहेबांसमोर खडे बोल सुनावणाऱ्या अजितदादांच्या स्पष्टवक्तेपणामुळे भाजपची नक्कीच अडचण होत असणार म्हणून कदाचित भाजपने कालच्या कार्यक्रमात अजित दादांना बोलू दिले नाही, असा आरोप त्यांनी केला.
त्यांनी पुढे म्हंटले आहे की, वारकऱ्यांच्या कार्यक्रमात सर्व भेद, द्वेष, अहंकार विसरून सहभागी व्हायचे असते. परंतु अहंकाराच्या आहारी गेलेल्या प्रदेश भाजपच्या नेत्यांकडून ही अपेक्षा करणे व्यर्थ आहे. अहंकाराबद्दल संतश्रेष्ठ तुकाराम महाराज म्हणतात अहंकार हा आत्मनाश घडवितो, माणसाला सत्यापर्यंत पोचू देत नाही. अहंकारी मनुष्य ‘आपण मोठे आहोत’ अशी भावना डोक्यात धरून गुरगुरत राहतो आणि असंच काहीसं आज प्रदेश भाजप नेत्यांचं झालं असावं. असो संत तुकोबारायांच्या दर्शनाने नक्कीच सर्वांना सद्बुद्धी प्राप्त होईल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्ते केली.
उपमुख्यमंत्री आणि पुणे पालकमंत्री अजित पवार यांना बोलू न देणे महाराष्ट्राचा अपमान – सुप्रिया सुळे
देहू येथील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांना बोलण्याची संधी देण्यात आली नाही हा महाराष्ट्राचा अपमान आहे अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रियाताई सुळे यांनी देखील ट्वीट करत नाराजी व्यक्त केली आहे. खासदार सुप्रियाताई सुळे यांनी अजित पवार यांना बोलू देण्यात आले नाही हे समजताच ट्वीट करत नाराजी व्यक्त केली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या देहू येथील कार्यक्रमात राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना बोलण्याची संधी दिली. परंतु राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री अजितदादा पवार यांना बोलू दिले नाही यावर खासदार सुप्रियाताई सुळे यांनी ट्वीटच्या माध्यमातून प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.






