अहमदनगर प्रतिनिधी
केंद्र सरकारच्या प्रत्येक योजनेच्या निधीची कामे आमदार स्वतःचे दाखवत आहेत. तत्कालीन आमदार राम शिंदे व शिवाजी कर्डिले आदींनी आणलेल्या कामांचा नारळ आज फोडला जात आहे. दुर्दैवाने लाट आली, ते पराभूत झाले. माजी मंत्री प्रा राम शिंदे व माजी आमदार शिवाजी कर्डिले यांनी मंजुर करुन आणलेली कामे लपून राहु शकत नाहीत असा टोला खा. सुजय विखे-पाटील यांनी महाविकास आघाडीच्या आमदारांना लावला.
अहमदनगर दक्षिणचे लोकसभा मतदारसंघातील खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या खासदारकीला तीन वर्षे पूर्ण झाले. या निमित्त मागील तीन वर्षांतील कामांचा लेखाजोखा त्यांनी पत्रकारांसमोर मांडला. याप्रसंगी जिल्हाध्यक्ष अरुण मुंढे, शहर जिल्हाध्यक्ष भैय्या गंधे ,माजी महापौर बाबासाहेब वाकळे ,भाजपचे ओबीसी मोर्चे चे प्रदेश उपाध्यक्ष किशोर डागवाले, नगर तालुका अध्यक्ष मनोज कोकाटे उपस्थित होते.

अहमदनगर-मनमाड रस्त्यांचे काम राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे असूनही पूर्ण होण्यात अडचणी येत असल्याचे सांगताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या लोकप्रतिनिधीने टक्केवारी मागितल्याचा आरोप करत. खासदार डॉ. सुजय विखे पाटील म्हणाले की, अहमदनगर-करमाळा, अहमदनगर-जामखेड, शहरातील उड्डाणपूल, बाह्यवळण रस्ता, सुरत-हैद्राबाद रस्ता ही कामे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून वेगात पूर्ण केली जात आहेत. एका वर्षांत ही कामे मार्गी लागतील. मात्र अहमदनगर-मनमाड रस्त्याचे काम राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या ठेकेदाराकडून योग्य पद्धतीने होत नाही. या कामात ठेकेदाराला महाविकास आघाडीच्या एका लोकप्रतिनिधीने टक्केवारी मागितली. ही टक्केवारीमुळे काम करणे परवडत नसल्याने ठेकेदार काम थांबवित आहे, असा आरोपही त्यांनी यावेळी केला.
डॉ. सुजय विखे पाटील म्हणाले, शिवसेना संपवण्यासासाठी राष्ट्रवादीचा जन्म झाला आहे. टक्केवारी मागणारा लोकप्रतिनिधी कोण असे विचारल्यावर त्यांनी सांगितले की, अहमदनगर ते शिर्डी दरम्यान चार लोकप्रतिनिधी येतात. शिर्डी मतदार संघात माझे वडील आहेत त्यांच्या विरोधात मी बोलणार नाही व अहमदनगर दक्षिणमध्ये मी खासदार असल्याने माझ्या विषयी बोलणार नाही. आता राहिले पारनेर व राहुरी आता त्यात टॉस करून ठरवा त्यांतील कोण, अशी कोपरखळीही खासदार विखे पाटील यांनी मारली.
ते पुढे म्हणाले की, राष्ट्रीय महामार्गाच्या याच कामात त्रास का झाला. केंद्र सरकारच्या निधीतून मंजूर झालेल्या कामांचे नारळ महाविकास आघाडीचे लोकप्रतिनिधी फोडत आहेत. प्रत्येक आमदार जलजीवन मिशनच्या कामाचा नारळ फोडत आहे. जलजीवन मिशनमधून 350 कोटी रूपये जिल्ह्यासाठी मंजूर आहेत. त्यातील 95 टक्के कामांचे कार्यारंभ आदेश अजून निघालेले नाहीत. त्याच्या फेरनिविदा काढाव्या लागत आहेत. तरीही प्रत्येक आमदार नारळ फोडत आहे. गावातून सत्कार स्वीकारत आहे.
मी मागील तीन वर्षांत कोणतेही माजी खासदार दिलीप गांधी यांचे काम स्वतःचे दाखवून श्रेय घेतले नाही. दिलीप गांधींनी केलेले काम त्यांनीच केल्याचे मी आवर्जुन सांगतो. मागील तीन वर्षांत मी 14 हजार कोटी रुपयांची कामे आणली, असे त्यांनी स्पष्ट केले. मौती, दहावे, लग्न या पलिकडे राजकारण आहे. हे अहमदनगर दक्षिणच्या लोकांना कळेल त्यावेळीच या भागाचा विकास होईल. जिल्ह्यात प्रशासनाचा गैरवापर वाढला आहे. आमदार प्रशासकीय अधिकारी व पोलिसांच्या माध्यमातून भाजपच्या लोकांवर दबाव टाकत आहेत. बोलण्याचे स्वातंत्र्य राहिलेले नाही.


