कुशीनगर : उत्तरप्रदेशच्या कुशीनगरमधू एक धक्कादायक घटना समोर आली आहे. बुधवारी सायंकाळच्या सुमारास अनेक महिला विहिरीत पडल्याची घटना घडली. समोर आलेल्या माहितीनुसार या घटनेत आतापर्यंत सुमारे 13
महिलांचा मृत्यू झाला आहे. या घटनेने शहरात खळबळ उडाली आहे. स्थानिकांच्या मदतीने बचाव कार्याला सुरुवात करण्यात आली आहे. कुशीनगरमधील नेबुआ नौरंगिया पोलीस ठाण्याच्या क्षेत्रात ही दुर्देवी घटना घडली.
घटनेबाबत अधिक माहिती अशी की, नौरंगिया शाळेच्या मैदानात एका लग्नाचा कार्यक्रम सुरू होता. बुधवारी या ठिकाणी हळदीच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. काही महिला आणि मुली विहिरीवर लावलेल्या जाळीवर उभ्या होत्या. त्याचवेळी हळद लावण्याचा कार्यक्रम सुरू झाला आणि काही महिला जाळीवर चढल्याने महिलांच्या वजनाने लोखंडी पातळ जाळी तुटली. त्यामुळे या जाळीवर उभ्या असलेल्या सर्व महिला एकापाठोपाठ एक करून अनेक महीला विहिरीत कोसळल्या. त्यात दोन मुलींचाही समावेश होता. त्यामुळे एकच गोंधळ उडाला. विहिरीतून महिलांचा किंचाळण्याचा आवाज येते होता. तर पाण्याने भरलेल्या विहिरीत जीव वाचवण्यासाठी काही महिला शेवटची धडपड करताना दिसत होत्या. मात्र, पोलीस घटनास्थळी पोहोचेपर्यंत आणि स्थानिकांनी या महिलांना पाण्यातून बाहेर काढेपर्यंत 13 महिलांचा बुडून मृत्यू झाला. तर दोन महिलांचा जीव वाचला आहे. या दोन महिला गंभीर असून त्यांना दवाखान्यात नेण्यात आलं आहे.
बचाव कार्यात अडथळे
या घटनेचा सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यावरून या दुर्घटनेचा अंदाजा येतो. महिला विहिरीत कोसळल्यानंतर काही लोक शिडी लावून विहिरीत उतरताना दिसत आहे. या लोकांनी विहिरीत उतरून मदत कार्य सुरू केलं. मात्र, रात्रीचा अंधार असल्याने मदतकार्यात अडथळा निर्माण होत आहे. परंतु, तरीही टॉर्च लावून स्थानिक लोक महिलांचे मृतदेह बाहेर काढण्याचं काम करत आहेत. या दुर्देवी घटनेची माहिती मिळताच मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी त्यावर शोक व्यक्त केला आहे. मुख्यमंत्र्यांनी ट्विट करून शोक व्यक्त केला आहे. तसेच तात्काळ बचावकार्य करा, जखमींना रुग्णालयात दाखल करून त्यांच्यावर योग्य उपचार करा, असे निर्देशच योगी आदित्यनाथ यांनी दिले आहेत.






