कडा प्रतिनिधी: राजेेद्र जैन
आयुष्यभर स्वत:च्या देहाची पर्वा न करता गुरूवर्य मदन महाराजांनी चंदनासारखं झिजून गोरगरीब समाजासाठी आपला देह समर्पित केला, या संतनगरीत मनामनात अध्यात्माची गोडी निर्माण केली. त्यामुळे या भूमित त्यांच्या पवित्र कार्याचा सुगंध पंचवीस वर्षानंतरही अखंडपणे दरवळत असल्याचे प्रतिपादन गुरुवर्य प.पू. मदन महाराज संस्थानचे मठाधिपती हभप.बबन महाराज बहीरवाल यांनी केले.
आष्टी तालुक्यातील कडा येथील भाविक- भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या वै.प. पू. गुरूवर्य मदन महाराज बिहाणी यांच्या रौप्य महोत्सवानिमित्त आयोजित अखंड हरिनाम सप्ताह सोहळयाच्या काल्याच्या किर्तनात ते बोलत होते.
पुढे बोलताना बबन महाराज म्हणाले की, त्यागाशिवाय मानवाचं जीवन व्यर्थ असून एक दाणा जेंव्हा स्वत:ला गाडून घेतो, तेंव्हा हजारो दाणे तयार होतात. जे दाणे त्याग करीत नाहीत, तेच गिरणीत भरडले जातात. गुरूवर्य संत मदन महाराजांनी समाजासाठी स्वत:चा देह समर्मित केला. आयुष्यभर उघडे राहीले, चंदनासारखे झिजले, आपल्या देहाची पर्वा न करता गोरगरीब, निराधार समाजाची अखंड सेवा केली, म्हणूनच त्यांच्या अध्यात्मिक कार्याची सुगंध या पवित्र भूमित दरवळताना दिसत आहे. त्यामुळे प्रत्येकाच्या आयुष्यात मानवी जीवनात संत संगत महत्वाची आहे. चिंतारहीत जीवन हे निश्चिंत जीवन आहे. अन् निश्चिंत जीवन हे भगवत प्राप्तीत संपन्न होतं. त्याकरिता परमार्थात चित्त आवश्यक आहे. सध्या काळात समाजात संस्कार संपन्न, निर्व्यसणी पिढी निर्माण होण्याची गरज आहे. आपल्या मुलांना शिक्षण द्या, परंतू वार्धक्यात आईवडिलांना वृध्दाश्रम दाखवणार नाहीत, याचीही काळजी घेतली पाहिजे. कारण वृध्दाश्रम हा हिंदुस्तानला लागलेला कलंक असून वृध्दाश्रम ही एकप्रकारे वृध्दांसाठी जनावरांसारखी छावणी आहे. प्रत्येकाने वार्धक्यात आई- वडिलांचा संभाळ करुन काळजी घेण्याची गरज आहे. ख-या अर्थाने तेच आपले दैवत असल्याचे त्यांनी सांगीतले. याप्रसंगी बबन महाराजांनी गुरुवर्य मदन महाराजांचा त्याग आणि आठवणींना उजाळा देेत उपस्थित हजारो भाविक भक्तांना आपल्या रसाळ अमृतवाणीने मंत्रमुग्ध केले.
याप्रसंगी हभप निवृत्ती महाराज बोडखे, हभप वाघ गुरुजी, दादा महाराज चांगुणे, माजी आमदार साहेबराव दरेकर, भीमराव पाटील, चंद्रकांत आजबे, अण्णासो, चौधरी, उपसरपंच संपत कर्डीले, माजी सभापती रमजानभाई तांबोळी, संजय ढोबळे, संजय गाढवे, हनुमान बिहाणी, हेमंत बिहाणी, सुभाष सोनवणे, विक्रम पोकळे, राजू कर्डीले, ज्ञानेश्वर चौधरी, धनंजय फिस्के, प्रा शाम सांगळे, पुरुषोत्तम जोशी, गोरख कर्डीले, संपत सांगळे, नागेश कर्डीले,राम मधूरकर, चंद्रकांत ससाणे, परमेश्वर कर्डीले, सतोष ओव्हाळ, अनिल शिंदे, संतोष भंडारी, हरिभाऊ मार्कंडे, अंबादास अनार्से, सुनील देशमुख, संभाजी कर्डिले, बाळासाहेब कर्डीले, भाऊसाहेब भोजने यांच्यासह राजकीय, सामाजिक, वैद्यकीय, शैक्षणिक, धार्मिक क्षेत्रातील भाविकभक्त, महिला हजारोंच्या संख्येने उपस्थित होते. यावेळी श्रीराम विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी श्रमदान केले.






