जामखेड प्रतिनिधी
राज्य सरकार व केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यामध्ये तुलना केली असता चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यातील व एस टी महामंडळातील कर्मचाऱ्यामध्ये फार मोठी तफावत आहे. राज्यात एका नंतर एक ३५ आत्महत्या झाल्या तरी या महाविकास आघाडी सरकारला जाग येत नाही. या एस.टी. महामंडळाचे मंत्री बोलत नाहीत. मुख्यमंत्री बोलत नाहीत, कर्ते – करविते बोलत नाहीत. कर्मचारी आत्महत्या करत असताना महाविकास आघाडी सरकार साधी चर्चा करायलाही तयार नाही, अशी टीका माजी मंत्री राम शिंदे यांनी सरकारवर केली.
माजी मंत्री प्रा राम शिंदे यांनी गेल्या चार दिवसांपासून जामखेड एस टी अगाराच्या कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपाबाबत नुकतीच आंदोलनाच्या ठिकाणी भेट घेतली व एस टी कर्मचाऱ्यांच्या भावना जाणुन घेतल्या. यानंतर जामखेड येथे एस टी कर्मचाऱ्यांच्या शांतीपूर्ण मार्गाने चाललेल्या संपाला भारतीय जनता पार्टी च्या वतीने जाहीर पाठिंबा देण्यात आला. त्यावेळी प्रा. शिंदे बोलत होते.
एस. टी. कर्मचाऱ्यांचा जर मेळावा विरोधी पक्षात असताना ज्या- ज्या गोष्टी बोलल्या त्या सत्तेमध्ये आल्यानंतर त्या अधिवेशनाला उपस्थित रहिलेले जाणते राजे शरद पवार साहेबांना माहित नाही का? असाही सवाल त्यांनी उपस्थित केला. संपूर्ण महाराष्ट्रभर भारतीय जनता पार्टी च्या वतीने एस टी कर्मचाऱ्यांच्या आंदोलना ला पाठिंबा तसेच प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील आंदोलना ला पाठिंबा दर्शविला आहे.
या दिवाळीच्या तोंडावरती सगळे एस टी महामंडळाचे सर्व कर्मचारी उपोषण , आंदोलन, धरणे आंदोलन करीत आहेत.
एस टी कर्मचाऱ्यांवर अन्याय,अत्याचार होत असून तसेच त्यांना पगार नाही. आत्महत्या करण्याची वेळ आली आहे. अशा परिस्थितीत दिवाळी च्या मुहूर्तावर राज्य सरकार एस टी कर्मचाऱ्यांशी चर्चा करु शकत नाही. त्यांच्या प्रश्नांना व मागण्यांना न्याय देऊ शकत नाही.
वास्तविक पाहता एस टी कर्मचारी यांच्यावर ही वेळ येणं, सरकारने ऐन दिवाळीत विचारात न घेणं, चर्चा न करणं हे प्रश्न सोडवण्यासाठी न बोलवणं हे त्यांच्याप्रती असंवेदनशीलता दाखवण्यासारखे आहे. याप्रसंगी माजी सभापती डाॅ. भगवान मुरुमकर, भाजपा युवा मोर्चा ता. अध्यक्ष पै. शरद कार्ले, शहर अध्यध बिभिषन धनवडे, प्रविण चोरडिया, मोहन गडदे, डॉ. महेश मासाळ, गोरख घनवट, शिवकुमार डोंगरे, प्रसिद्धी प्रमुख उध्दव हुलगुंडे आदी सर्व कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.






