देशातील सर्वात उंच भगवा स्वराज्य ध्वज खर्डा किल्ल्यावर फडकणार.

जामखेड प्रतिनिधी, सोमवार, १६ ऑगस्ट

आमदार रोहित पवार यांनी महाराष्ट्राच्या ऐतिहासिक किल्ल्यांमधील अहमदनगर जिल्ह्यातील खर्डा येथील भुईकोट किल्ल्याच्या बाबत महत्वपूर्ण घोषणा केली. अहमदनगर जिल्ह्यात वसलेला खर्डा किंवा शिवपट्टन किल्ला महाराष्ट्राचा इतिहास सांगतो. खर्डा किल्ल्याच्या याच कातळांनी एकेकाळच्या निधड्या छातीच्या रांगड्या मावळ्यांचा पराक्रम पाहिला आहे. तेव्हा या किल्ल्याच्या आवारात शौर्य आणि एकतेचं प्रतीक म्हणून आणि उत्तम गुणांनीं संपन्न असलेला, ७४ मीटरचा, जगातील सर्वात मोठा भगव्या रुंगाचा स्वराज्य ध्वज लावला जाणार आहे.

भारतातील मुख्य धार्मिक ठिकाणी आणि पंढरपूरला हा ध्वज फिरवला जाईल. शेवटी १५ ऑक्टोबर २०२१ रोजी स्वराज्य ध्वज खर्डा किल्ल्याच्या आवारात लावला जाईल. या ध्वजविषयी मत व्यक्त करताना आमदार रोहित पवार म्हणाले की हा भगवा रंगाचा स्वराज्य ध्वज कोणा एकाचा नसून सर्वांचा आहे आणि या ध्वजाच्या माध्यमातून कर्जत-जामखेड मतदारसंघाला नवी ओळख मिळवून देण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.

खर्ड्याच्या किल्ल्यात फडकविण्यात येणाऱ्या देशातील किंबहुना जगातील सर्वांत उंच (७४ मीटर) अशा भगव्या स्वराज्य ध्वजाचं उपस्थित संत-महंतांच्या हस्ते पूजन करण्यात आलं. यानंतर पुढील दोन महिने देशभरातील प्रमुख ७४ अध्यात्मिक व धार्मिक स्थळी, संतपीठांच्या ठिकाणी आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या किल्ल्यांवर हा ध्वज नेण्यात येणार आहे. तिथं पूजन केल्यानंतर शेवटी पंढरपूरच्या विठुरायाच्या अंगणात या ध्वजाची पूजा करून १५ ऑक्टोबर रोजी तो मान्यवर मंडळींच्या उपस्थितीत खर्ड्याच्या किल्ल्यात अभिमानाने फडकविण्यात येणार आहे. हा ध्वज जगभरातील पर्यटकांचं आकर्षण ठरणारच पण सामर्थ्य, धैर्य, शक्ती, भक्ती, प्रगती याचं प्रतीक ठरेल आणि डौलाने फडकत राहील, असा विश्वास आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here