मुंबई :देशातील कोरानाच्या लाटेचा कहर आता बऱ्यापैकी ओसरला आहे. महाराष्ट्रातही कोरोनाच्या रुग्णवाढीला ब्रेक लागला आहे. कोरोनाचा कहर कमी झाल्यानंतर आता राज्यात अनलॉकची प्रक्रिया सुरू झाली आहे. दरम्यान, कोरोनाकाळात बंद असलेले शाळेचे दरवाजे राज्यातील विद्यार्थ्यांसाठी पुन्हा एकदा उघडण्याची शक्यता आहे.

राज्यातील कोरोनामुक्त भागामध्ये पुन्हा एकदा शाळेची घंटा वाजणार आहे. राज्यातील कोरोनामुक्त भागात शाळा सुरू होणार आहे. या भागातील आठवी ते बारावीपर्यंतचे वर्ग उघडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अशा प्रकारे शाळा सुरू करण्याबाबतचा निर्णय घेण्याबाबतचे सर्वाधिकार हे ग्रामपंचायतींना देण्यात आलेले आहेत. दरम्यान, या शाळा सुरू झाल्यावर शाळांमध्ये कडक नियमांचे पालन करावे लागणार आहे. शाळांमध्ये एका बेंचवर केवळ एका विद्यार्थ्याला बसण्याची परवानगी असेल. तसेच दोन बेंचमध्ये सहा फुटांचे अंतर ठेवले जाईल. तसेच विद्यार्थ्यांना कोरोनाविषयक नियमांचे पालन करावे लागणार आहे. तसेच त्यांना सतत हात धुवावे लागतील.

गेल्या काही काळात राज्यातील कोरोनाची रुग्णसंख्या सातत्याने कमी होत आहे. राज्यात काल ९ हजार ३३६ कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली. तर आज नवीन ३ हजार ३७८ कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत एकूण ५८ लाख ४८ हजार ६९३ रुग्ण बरे झाले. सध्या राज्यात एकूण १ लाख २३ हजार २२५ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता ९५.९१ टक्के एवढे आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here