

जामखेडच्या महामार्गावर पेच; प्रशासन, लोकप्रतिनिधींची भूमिका चर्चेत.
जामखेड प्रतिनिधी
जामखेड शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्र. ५४८ डी वरील अतिक्रमण आणि रखडलेल्या रस्त्याच्या कामाबाबत प्रशासनाने दिलेल्या लेखी आश्वासनानंतरही प्रत्यक्ष काम सुरू झालेले नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी वाढली आहे. “आश्वासन मिळाले, पण काम कधी सुरू होणार?” असा सवाल जामखेडकरांकडून उपस्थित केला जात आहे.

या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते अवधूत पवार यांनी तहसील कार्यालयासमोर साखळी उपोषण केले होते. आंदोलनाला नागरिकांसह विविध संघटनांचा मोठा पाठिंबा मिळाला होता. संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे तसेच खासदार निलेश लंके यांनी उपोषणस्थळी भेट देत आंदोलनाला पाठिंबा दर्शविला होता. खासदार लंके यांनी राष्ट्रीय महामार्ग विभागाचे कार्यकारी अभियंता संजय शेवाळे यांना चांगलेच धारेवर धरल्यानंतर त्यांनी जामखेड येथे येऊन भुमिअभिलेख विभागाच्या मदतीने दि.२४ मार्चपूर्वी महामार्गाची हद्द निश्चित करण्यात येईल, असे लेखी आश्वासन दिले होते. मात्र अद्याप प्रत्यक्ष कामाची गती दिसत नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. या रस्त्यावर वारंवार होणारे अपघात, वाहतूक कोंडी आणि अतिक्रमणामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत.

दरम्यान, आंदोलनस्थळी भेट देऊन कारवाईचे आश्वासन देणारे विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे या प्रश्नावर काय भूमिका घेतात, याकडे जामखेडकरांचे लक्ष लागले आहे. तसेच स्थानिक आमदार रोहित पवार यांनी जनतेच्या जिव्हाळ्याच्या या प्रश्नावर पाठ फिरवल्याने नागरिकांत उलटसुलट चर्चा सुरू असल्याचेही बोलले जात आहे.
विषेश म्हणजे अतिक्रमण व रखडलेल्या रस्त्याचे काम पूर्ण होत नसल्याच्या निषेधार्थ जामखेड करांच्या वतीने एक दिवसाचा जामखेड बंद पाळण्यात आला होता. मात्र तरी देखील अद्यापही प्रशासन फक्त बघ्याची भूमिका घेत आहे. आता प्रशासनाने लवकर ठोस कारवाई केली नाही, तर पुन्हा आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल, असा इशाराही आंदोलनकर्त्यांकडून देण्यात आला आहे. त्यामुळे जामखेडमधील राष्ट्रीय महामार्गाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.







