जामखेड प्रतिनिधी
वेळोवेळी मागणी करुनही जामखेड जवळील आहील्यावस्ती ते काझेवाडी रस्त्याचे काम पूर्ण झाले नाही. त्यामुळे पावसाळ्यात याठिकाणी ये जा करण्यासाठी मोठी तारेवरची कसरत करावी लागत आहे. त्यामुळे या ठिकाणी रस्त्याची तातडीने दुरुस्ती करुन मुरमीकरण करावे अशी मागणी परीसरातील नागरिकांनी केली आहे.
या बाबत चे निवेदन अझरुद्दीन काझी यांच्या उपस्थितीत व ग्रामस्थांच्या समवेत जामखेड नगरपरिषदेस देण्यात आले. पुढे निवेदनात म्हटले आहे की परीसरातील नागरीकांनी नगर परिषद कार्यालयात येऊन वेळोवेळी तोंडी व लेखी विनंती अर्ज केले आहेत. आहील्यावस्ती ते काझेवाडी, देशमुख वस्ती, म्हेत्रे वस्ती, कोल्हे वस्ती, खेत्रे वस्ती, चटेकर वस्ती या रस्त्याचे काम पूर्ण करण्यासाठी दिले होते. असे असतानाही अद्याप या ठिकाणी रस्ता झाला नाही. आज पर्यंत अनेक वाडी वस्तीवर डांबरीकरण व सिमेंट रस्ते झाले आहेत मात्र याठिकाणी अद्याप पक्का रस्ता झाला नाही. परीणामी पावसाळ्यात या ठिकाणी मोठी तारेवरची कसरत करावी लागते. अजारी व्यक्तीला दवाखान्यात घेऊन जाता येत नाही. तसेच शेतीची मशागत करता येत नाही त्यामुळे शेतीचे नुकसान होते. त्यामुळे या ठीकाणी सिमेंट रस्ता व डांबरीकरण करण्यात यावे तो पर्यंत या रस्त्यावर तातडीने मुरुम टाकण्यात यावा अशी मागणी केली आहे. निवेदन देता वेळी अझरुद्दीन काझी, उमेश देशमुख, मझहर काझी, कैलास हजारे, बाळासाहेब कोल्हे, युवराज चटेकर, अनिल म्हेत्रे, इस्माईल शेख टेलर व सोहेल काझी उपस्थित होते.