

राष्ट्रीय महामार्गाच्या बाजूला असलेल्या अतिक्रमण धारकांना नगरपरिषदेच्या नोटीसा
सात दिवसात अतिक्रमण हटवा, अन्यथा कारवाई
जामखेड प्रतिनिधी
जामखेड शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्र. 548-D वरील जामखेड ते सोताडा मार्गाच्या हद्दीत व रस्त्यालगत करण्यात आलेल्या अनधिकृत बांधकामे व अतिक्रमणाबाबत जामखेड नगरपरिषदेकडून संबंधित अतिक्रमण धारकांना नोटीसा बजावण्यात आलेल्या आहेत. नगराध्यक्ष तसेच राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयानुसार ही कारवाई सुरू करण्यात आली असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

शासनाच्या नगर विकास विभागाच्या निर्देशानुसार तसेच शहर विकास आराखड्यानुसार सदर रस्ता शहराच्या महत्त्वाच्या विकास योजनेत समाविष्ट असून, भविष्यात पाणीपुरवठा व भूमिगत गटर योजनेची कामे प्रस्तावित आहेत. रस्त्याच्या विकासकामांना अडथळा निर्माण होऊ नये तसेच नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने ही कारवाई करण्यात येत असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.
नोटीस मिळाल्यापासून सात (७) दिवसांच्या आत संबंधितांनी अतिक्रमण स्वखर्चाने काढून घ्यावे, अन्यथा संबंधित विभागामार्फत अतिक्रमण हटविण्याची कारवाई करण्यात येईल व त्याचा खर्च संबंधितांकडून वसूल करण्यात येणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे. शहराचा नियोजनबद्ध विकास, वाहतुकीची सोय व नागरिकांची सुरक्षितता लक्षात घेता सर्व नागरिकांनी प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

1) चौकट
गेली कित्येक वर्षे अतिक्रमण हटविण्याच्या नावाखाली केवळ नोटिसा बजावल्या जातात.तसेच प्रत्यक्ष कारवाईच्या वेळी मात्र पक्की व मोठ्या स्वरूपातील अतिक्रमणे कायम ठेवून हातावर पोट भरणाऱ्या गोरगरीबांच्या टपऱ्यांवरच कारवाई होत असल्याचे चित्र वारंवार पाहायला मिळाले आहे. मात्र यावेळी प्रशासनाने ही पद्धत बदलून प्रथम रस्त्याच्या विकासाला अडथळा ठरणारी पक्की अतिक्रमणे हटवावीत.
(अवधूत पवार, सामाजिक कार्यकर्ते)
(2 चौकट
नगरपालिका प्रशासनाने नगरपालिका हद्दीतील अतिक्रमणे नियमानुसार हटवून पाणीपुरवठा योजना व भुयारी गटार योजनेची कामे दर्जेदार व पारदर्शक पद्धतीने तात्काळ सुरू करावीत. जामखेड शहराचा सर्वांगीण व नियोजनबद्ध विकास हा प्राधान्याचा विषय असून जनहिताच्या प्रत्येक कामासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष सकारात्मक व जबाबदार भूमिकेतून नगरपालिका प्रशासनासोबत उभा राहील. शहराच्या विकासासाठी आवश्यक ते सहकार्य पक्षाकडून दिले जाईल.
(शहाजी राळेभात, राष्ट्रवादी नेते)








