अहिल्यानगर हादरले! फोन केला, पण बायकोने फोन केला ब्लॉक; 4 मुलांना विहिरीत ढकलून पित्याने केली आत्महत्या

अहिल्यानगर: माहेरी गेलेली पत्नी सासरी परत येण्यास नकार देत होती. पतीचा मोबाईल नंबरही तिने ब्लॉक केला. या रागातून तिला घायला निघालेल्या पातीने वाटेतच चार मुलांना विहीरीत ढकलून देत आत्महत्या केली. राहाता तालुक्यातील कोऱ्हाळे शिवरात ही घटना घडली. हे कुटुंब मुळचे श्रीगोंदा तालुक्यातील असून महिलेचे माहेर येवला तालुक्यात आहे.

यासंबंधी मिळालेली माहिती अशी, चिखली (ता. श्रीगोंदा) येथील अरुण सुनील काळे (वय ३०) याची पत्नी शिल्पा अरुण काळे वादामुळे येवला तालुक्यातील माहेरी गेली होती. ती परत येत नव्हती. त्यामुळे अरुण काळे आपल्या चार मुलांसह दुचाकीवरून तिला घ्यायला निघाला होता. राहाता तालुक्यातील कोऱ्हाळे येथे आल्यावर त्याने पत्नीशी पुन्हा संपर्क केला. मात्र, तिने नंतर पतीचा मोबाईल नंबर ब्लॅाक केल्याने संपर्क होत नव्हता. याचा राग आल्याने आणि दारूच्या नशेत असल्याने अरुण काळे याने आपली मुले शिवानी (वय ८), प्रेम (वय ७), वीर (वय ६) व कबीर (वय ५) यांना विहिरीत ढकलेले. त्यानंतर स्वत:ही विहिरीत उडी घेत आत्महत्या केली. शनिवारी दुपारी ही घटना उघडकीस आली. काळे याची मुले अहिल्यानगर तालुक्यातील एका आश्रम शाळेत शिकत होती. त्यांना केस कापण्याच्या बहाण्याने तो घेऊन आला होता आणि सासुरवाडीला घेऊन निघाला होता. पोलिसांनी पाचही मृतदेह बाहेर काढून पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू केली. आधी पत्नीशी बोलताना त्याने आत्महत्या करण्याची धमकी दिली होती. त्यामुळे प्रथमदर्शनी ही आत्महत्या असल्याचे दिसत असले तरी आम्ही सर्व शक्यता गृहीत धरून तपास करीत असल्याचे पोलिसांनी सांगितले.

दरम्यान, विहिरीत दोन मृतदेह तरंगताना दिसल्याचे शनिवारी दुपारी केलवडचे पोलीस पाटील सुरेश गमे पाटील यांनी पोलिसांना कळविले. त्यानंतर पोलीस निरीक्षक नितीन चव्हाण फौजफाट्यासह घटनास्थळी दाखल झाले. शिर्डी व राहाता नगरपरिषदेचे आपत्ती निवारण पथकाला मदतीसाठी बोलवले. दोन लहान मुलांचे मृतदेह पाण्यावर तरंगत होते. त्या विहिरीत ३० ते ३५ फूट पाणी आहे. त्यामुळे पाण्यात उतरून मदतकार्य अशक्य होते. अखेर गळ सोडून शोध मोहीम सुरू करण्यात आली आणि एका पाठोपाठ एक मृतदेह बाहेर काढण्यात आले.

दरम्यान, पोलीस उपाधिक्षक शिरीष वमने यांनी सांगितले की, मृत अरूण काळे याची पत्नी येवला तालुक्यातील माहेरी गेली होती. तिला परत आणण्यासाठी काळे आपल्या मुलांसह दुचाकीवरून या रस्त्याने येवल्याकडे निघाला होता. मध्येच त्याचा फोनवरून पुन्हा पत्नीशी वाद झाला आणि त्याने हे टोकाचे पाऊल उचलले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here