जामखेड शहराला पाणीपुरवठा करणारा भुतवडा तलाव १०० टक्के भरला, मोहरी ,रत्नापुर व धोत्री यापुर्वीच ओव्हरफ्लो
जामखेड प्रतिनिधी
जामखेड शहराला पाणीपुरवठा करणारा भुतवडा तलाव व भुतवडा जोडतलाव ओव्हर फ्लो झाला यामुळे जामखेड शहर व पाच वाड्यावस्त्यांचा वर्षभराचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला आहे. मागिल तीन वर्षापासून तलाव ओव्हर फ्लो होत असतो त्यासाठी सप्टेंबर महिन्याची वाट पहावी लागत असे यावर्षी जुलै महिन्यात चांगला पाऊस झाला यामुळे जोड तलावासह दोन्ही तलाव पुर्ण क्षमतेने शंभर टक्के भरले आहेत.
जुलै महिन्यात जामखेड शहर व तालुक्यात जोरदार पाऊस झाला यामुळे जामखेड तालुक्यातील मोहरी व जामखेड शहरातील धोत्री व रत्नापूर तलाव यापूर्वीच ओव्हर फ्लो झाले आहेत. भुतवडा तलाव ओव्हर फ्लो झाला तरी जामखेड शहराला होणारा पाणीपुरवठा मात्र आठ दिवसाआड होत होता.
जामखेड शहराला पिण्याच्या पाण्यासाठी वरदान ठरलेला भुतवडा तलाव व भुतवडा जोडतलाव शुक्रवारी सकाळी सात वाजता पूर्ण क्षमतेने भरला असून ओव्हर फ्लो झाला आहे. भुतवडा तलावाची पाणीसाठा क्षमता ११९ दशलक्ष घनफूट व भुतवडा जोडतलाव ४८ दशलक्ष घनफूट क्षमतेचा आहे. या तलावातून ४२ दशलक्ष घनफूट पाणी जामखेड नगरपरिषदेला पाटबंधारे विभागाकडून वर्षभरासाठी दिला जातो. जामखेड शहर व सात वाड्या वस्त्यांना पिण्याच्या पाण्यासाठी उजनी धरणातून (दहीगाव) येथून होणारा पाणी पुरवठ्याचे काम प्रगती पथावर असून ४० टक्के झाले आहे.
जामखेड शहराची वाढती लोकसंख्या व वाढता विस्तार पाहता ४५ वर्षापूर्वी जुनी असलेल्या पाईपलाईन मधून भुतवडा तलावातून ग्रॅव्हिटीद्वारे थेट पाणीपुरवठा २४ तास चालू असतो. शहराचा विस्तार वाढल्याने प्रत्येक भागात पाणी पोहचण्या साठी विलंब होतो. परिणामी आठ दिवसा आड पाणीपुरवठा होतो. या तलावावर १५० हेक्टर क्षेत्रातील शेतीसाठी पाणी दिले जाते. त्यामुळे हा तलाव भरला की जामखेड शहरातील नागरिक व शेतकऱ्यांचा प्रश्न निकाली निघतो.