
शरद पवार त्यांचे सख्खे आजोबा नाहीत म्हणून ते असं बोलत असावे; आ. राम शिंदेंचा आ. रोहित पवार यांच्यावर घणाघात
जामखेड प्रतिनिधी
मी मागच्या दाराने आलो आहे हे मला मान्य आहे. २०१९च्या निवडणुकीत माझा पराभव झाला हेही मला मान्य आहे. शरद पवार हे गेले १५ वर्ष मागच्या दाराने आहेत. दररोज ते राज्य आणि केंद्र सरकारला सल्ले देतात, मग माझ्याबद्दल रोहित पवार बोलतात मागच्या दाराने, तर त्यांना शरद पवार यांच्याबद्दलही मागच्या दाराने म्हणायचे आहे का? कदाचित ते असं म्हणू शकतात कारण शरद पवार हे त्यांचे सख्खे आजोबा नाहीत, असा घणाघात भाजप नेते राम शिंदे यांनी रोहित पवार यांच्यावरती केला आहे.


आमदार राम शिंदे यांच्या तालुक्यातील चोंडी येथील निवासस्थानी दि २९ रोजी दिवाळी फराळ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास आरोग्य मंत्री तानाजी सावंत. खा. सुजय (दादा) विखे, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, मा.शिवाजीराव कर्डीले (मा.मंत्री महाराष्ट्र राज्य), आ. नारायण पाटील, सुवेंद्र गांधी, किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष वासुदेव काळे, भाजपचे जिल्हाध्यक्ष अरुण मुंढे सह जिल्ह्य़ासह, सचिन पोटरे, कर्जत व जामखेड तालुक्यातील भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


यावेळी आमदार राम शिंदे हे पत्रकारांशी बोलत होते. राम शिंदे विधानसभेचे आमदार झाल्यानंतर रोहित पवार यांनी त्यांना राजीनामा देऊन जनतेतून निवडून येण्याचे आव्हान दिले होते यावर राम शिंदे यांनी पलटवार केला आहे. गेली पंधरा वर्षे शरद पवार राज्यसभेचे खासदार आहेत मग ते मागच्या दाराने आले आहेत का? असं त्यांना म्हणायचं आहे का जर शरद पवार हे त्यांचे सख्खे आजोबा असते तर ते असं बोलले असते का असा प्रश्नही आमदार राम शिंदे यांनी उपस्थित केलाय. रोहित पवार यांनी भुरटं चॅलेंज देऊ नये ; गोलमाल करायचं नाही ; काय असलं तर थेट ; असे म्हणत आमदार राम शिंदे यांनी पुन्हा एकदा रोहित पवारांना आमदारकीचा राजीनामा देण्याचे ओपन चॅलेंज दिले .

यावेळी बोलताना आमदार राम शिंदे म्हणाले की, “आजच्या दिवाळी फराळ कार्यक्रमास आरोग्य मंत्री तानाजी सावंत हे आज चोंडीला आले होते. मंत्री महोदयांनी माझ्या दिवाळी फराळ कार्यक्रमाला भेट दिली, त्यांना देखील दहा फोन करून सांगितलं, साहेब नका ना जाऊ, साहेब नका ना जाऊ माझ्या मतदारसंघात, अरे, माझे आणि तानाजी सावंत साहेबांचे मित्रत्वाचे संबंध आहेत, असं कुठं असतं का राजकारणात,” असे म्हणत राम शिंदे यांनी आमदार रोहित पवार यांच्यावर गंभीर आरोप करत आरोपांचा धुराळा उडवून दिला आहे.

आमदार राम शिंदे हे मागच्या दाराने आमदार झाले आहेत अशी टीका आमदार रोहित पवार आणि शिंदे विरोधकांकडून सातत्याने होते, यावर बोलताना आमदार राम शिंदे म्हणाले कि, “मला ज्या मुद्द्यावरती टोकलं, मागच्या दाराने आलेत, मी विधान परिषदेेर आमदार झालोय हे मला मान्य, 2019 साली माझा पराभव झाला हेही मला मान्य आहे. परंतू आदरणीय शरद पवार साहेब गेली 15 वर्षे झाली मागच्या दाराने आहेत, आणि दररोज दैनंदिन राज्य आणि केंद्र सरकारला ते सल्ले देतात, मग माझ्यावर हे बोलतात मागच्या दाराने, तर त्यांना असं म्हणायचयं का? पवार साहेब देखील मागच्या दारानेत, माझं त्याच्यावर असं म्हणणं आहे की, पवार साहेब हे त्यांचे सख्खे आजोबा जर असते तर ते असं म्हटले नसते, चुलत आजोबा असल्यामुळं कदाचित त्यांनी वक्तव्य केलं असावं,” अशी खोचक टीका करत आमदार शिंदे यांनी रोहित पवारांचा जोरदार समाचार घेतला.

“मी हाडाचा कार्यकर्ताय आणि कार्यकर्त्याचा नेता झालो, मंत्री झालो, आणि म्हणून मी त्यांचे चॅलेंज स्विकारलं, पण विधान परिषदेचा आमदार राजीनामा देऊन निवडणूक लागत नाही, त्यासाठी विधानसभेच्या आमदाराने जर आमदारकीचा राजीनामा दिला तरच निवडणूक लागेल असे सांगत मी त्यांना चॅलेंज देतो, निवडणूक लागली कि मीही राजीनामा देऊनच तुमच्या पुढे उभा राहीन, मी बिगर राजीनाम्याचा पुढं उभा राहणार नाही, त्यामुळे राजीनामा आता विधानसभेच्या आमदाराने देणं अपेक्षित आहे. आणि मी जर राजीनामा देऊन निवडणूक लागली असती तर मीही दिला असता,” असे म्हणत राम शिंदे यांनी पुन्हा एकदा रोहित पवारांना आमदारकीचा राजीनामा देण्याचे खुले अव्हान दिले.

“आमदार राम शिंदे पुढे म्हणाले की, प्रश्न असाय की, चॅलेंज देऊन, असं भुरटं चॅलेंज देऊ नये, आलं का लक्षात, असं गोलमाल करायचं नाही, काय असलं तर थेट असे त्यामुळं चॅलेंज मी पण दिलयं, राजीनामा देऊन त्यांनी मैदानात उतराव, बघू कर्जत-जामखेडच्या जनतेच्या मनातकाय आहे ते, आणि मी देखील राजीनामा देऊनच पुढे उभा राहीन, असे म्हणत आमदार राम शिंदे यांनी मी निवडणूकीस सज्ज आहे असा इशारा दिला.”

भाजपमुळे राज्यात मंत्रिमंडळ विस्तार होत नाही त्यामुळे शिंदे गटात नाराजी आहे. अशा चर्चा म्हणजे केवळ कपोलकल्पित आहेत असे राम शिंदे यांनी म्हटल आहे. विरोधकांकडे कोणताही मुद्दा नाही म्हणून ते अशा बातम्या पसरवत आहेत, असा आरोप राम शिंदे यांनी केला आहे. आमच्या सरकारने अनेक लोकप्रिय निर्णय घेतलेत. विरोधकांकडे मुद्दा नाही म्हणून त्यांचं लक्ष केवळ आमच्या विस्ताराकडे लक्ष आहे, असे शिंदे म्हणाले. हे जनतेच्या मनातील सरकार आहे, शिंदे- फडणवीस सरकारमधील वरिष्ठ नेत्यांनी सूतोवाच केलेला आहे. अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळ विस्तार होईल असं राम शिंदे यांनी म्हटले आहे.


