मुंबई : राज्याच्या मंत्रिमंडळाचा लवकरच छोटा विस्तार होणार आहे. अनिल देशमुख यांच्या राजीनाम्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसची एक जागा रिकामी झाली आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसकडून ही जागा भरली जाणार आहे. हिवाळी अधिवेशनाच्या आधीच हा विस्तार होऊ शकतो. कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांना मंत्रिमंडळात स्थान मिळू शकते. त्यांना थेट कॅबिनेट मंत्रीपदाची संधी मिळू शकते अशी माहिती विश्वसनिय सूत्रांनी दिली आहे.

मंत्रिमंडळात मिळणार ही जबाबदारी?
अनिल देशमुख यांच्या राजीनाम्यानंतर गृहविभागाची धुरा दिलीप वळसे पाटील यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. त्यामुळे वळसे पाटील यांच्याकडे पूर्वी असलेले कामगार आणि उत्पादन शुल्क ही खाती रोहित पवार यांच्याकडं दिली जाण्याची शक्यता आहे. कोल्हापूरकडे दुर्लक्ष होत असल्याचं सांगत अहमदनगरचे पालकमंत्रीपद भूषवण्यास हसन मुश्रीफ यांनी नकार दिल्याचं कळतंय. त्यामुळे पालकमंत्रीपदाची जबाबदारीही रोहित पवार यांच्याकडे दिली जाण्याची शक्यात सूत्रांनी वर्तवली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिसऱ्या पिढीचे वारसदार म्हणून रोहित पवार यांच्याकडं पाहिलं जातंय. तरुण चेहरा, आमदार झाल्यानंतर विकासाच्या मुद्यावर अक्टीव्ह असणे आदी मुद्दे रोहित पवार यांच्याबाजून असल्याचं बोललं जातंय. तर दुसरीकडे विधानसभा अध्यक्षपदी संग्राम थोपटे यांची निवड होण्याची शक्यता आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here