

जामखेड येथे ७ मार्च रोजी होणार ऐतिहासिक विराट हिंदू संमेलन सोहळा
जामखेड प्रतिनिधी
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त जामखेड शहरात शनिवार, दि. ७ मार्च २०२६ रोजी सायंकाळी ठीक ६ वाजता भव्य ‘हिंदू संमेलनाचे’ आयोजन करण्यात आले आहे. राष्ट्रबांधणी, सामाजिक समरसता आणि कौटुंबिक मूल्यांचा जागर करण्यासाठी या हिंदू संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे.
या ऐतिहासिक महासंमेलनास ह.भ.प. महंत श्री रामगिरीजी महाराज (श्री गोदावरी धाम, सरला बेट) यांची प्रमुख उपस्थिती व राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, पश्चिम महाराष्ट्र प्रांत सहकार्यवाह, महेशजी करपे मार्गदर्शन लाभणार आहे. यासोबतच परिसरातील विविध संत-महंतांची पावन उपस्थिती या सोहळ्याला लाभणार आहे.
संमेलनाचा मुख्य उद्देश म्हणजे सामाजिक समरसता, जात, भाषा, प्रदेश किंवा आर्थिक स्थितीचा भेदभाव न करता सर्वांना आपले मानण्याचा संदेश याद्वारे दिला जाईल.
‘कुटुंब ते राष्ट्र’ हे महासंमेलन म्हणजे कुटुंब, समाज आणि राष्ट्र यांना एका विचाराने जोडणारे प्रभावी व्यासपीठ ठरणार आहे. कुटुंब हाच समाज आणि राष्ट्राचा पाया आहे, हा विचार जनमानसात रुजवणे हा यामागचा मुख्य हेतू आहे. तसेच पर्यावरण संरक्षण, पाणीबचत, वृक्षारोपण, नागरिक शिस्त, मातृभाषेचा आग्रह, स्वदेशी विचार आणि प्रखर राष्ट्रप्रेम या विषयांवर समाजाला दिशा दिली जाणार आहे.

एकात्मतेचा हुंकार ‘एक मंदिर, एक पाणवठा आणि एक स्मशानभूमी’ या विचारातून सामाजिक कार्य हे संघर्षासाठी नसून एकतेसाठी असते, ही भूमिका ठामपणे मांडली जाणार आहे. तरी या सोहळ्यास सहभागी होण्याचे आवाहन करण्यात येत असुन “जामखेडच्या सामाजिक आणि सांस्कृतिक इतिहासातील हा एक सुवर्णक्षण आहे. नागरिकांनी आपल्या कुटुंबासह मोठ्या संख्येने उपस्थित राहून राष्ट्रकार्यात सहभागी व्हावे आणि देशाला परम वैभवाकडे नेण्याच्या या संकल्पात आपण सहभागी व्हावे असे आवाहन सौ.रोहिणीताई काशिद ( समिती अध्यक्षा) व उपाध्यक्ष मोहन ढाळे, उपाध्यक्ष संतोष फिरोदिया, उपाध्यक्ष संतोष टेकाळे, उपाध्यक्ष संजय टेकाळे, यांच्या वतीने करण्यात आले.








